Ambadas Danve : मर्जीतील लोकांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग: अंबादास दानवेंचा आरोप | पुढारी

Ambadas Danve : मर्जीतील लोकांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग: अंबादास दानवेंचा आरोप

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्या मर्जीतील लोकांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन नागपूरच सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याचे पाप हे स्थानिक राजकीय नेतृत्वाने केल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला. अंबादास दानवे (Ambadas Danve)   यांनी आज (दि.२६) नागपूर येथे आलेल्या पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन पूरग्रस्त नागपूरच्या नागरिकांशी संवाद साधला.

या घटनेला नागपूर महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासही तितकेच जबाबदार असून यांच्यात समनव्य नसल्याचे दिसून आल्याचे म्हणत प्रशासन यंत्रणेच्या कारभारावरही दानवे यांनी बोट ठेवले. मुळात प्रशासन यंत्रणा ही घटना घडण्याची वाट बघत होते का ? अशी स्थिती आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे केले असले तरी अद्याप नागरिकांपर्यंत मदत पोहचणे आवश्यक आहे. अंबाझरी तलावाची संरक्षक भिंत तुटल्यानेच ही दुर्दैवी घटना घडली, असा आरोप केला. या भिंतीचे काम हे चार टप्प्यात होणार होते. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यावर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही दानवे  (Ambadas Danve) यांनी केला.

सध्या पुरामुळे पहिल्या टप्प्याचे काम नव्याने करावे लागेल, अशी स्थिती आहे. या संरक्षक भिंतीचे चारही टप्प्यांच्या कामाचा
नव्याने डीपीआर बनवून काम लवकरात लवकर हाती घ्यावे, या कामात आमचे सहकार्य राहील, असे जिल्हाधिकारी यांना सांगितल्याचे   दानवे म्हणाले.

दरम्यान, प्रशासन यंत्रणेवर नसलेले नियंत्रण, अतिविश्वास व विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांमुळे नागपूरकरांना महाभयंकर अशा पुराला सामोरे जावे लागत असेल. तर हे दुर्दैव असल्याची टीका यावेळी  दानवे यांनी केली. यावेळी संपर्क प्रमुख व आमदार दुष्यंत चतुर्वेदी, माजी खासदार प्रकाश जाधव , सुरेखा खोब्रागडे जिल्हा संघटिका शिल्पा बोडखे, पूर्व विदर्भ महिला संघटिका, माजी जिल्हा प्रमुख सतीश हरडे व पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button