काँग्रेसनं मराठवाड्याला काय दिलं ?; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल | पुढारी

काँग्रेसनं मराठवाड्याला काय दिलं ?; सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेला दुःख, वेदना, अविकसितपणा व्यतिरिक्त काहीही दिलं नसताना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे का? आम्ही न्याय देण्यासाठी निघालो तेव्हा संशयाचे धुकं निर्माण करायचे. स्वतः मात्र, वैधानिक विकास मंडळ गुंडाळून बसले. खरेतर काँग्रेसने मराठवाड्याच्या जनतेकडे जाऊन माफी मागितली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांच्या आग्रहातून मराठवाडा विकासासाठी ही बैठक होत आहे. काँग्रेसने सत्तेसाठी फक्त मराठवाड्यात दौरे केले आणि खुर्ची एके खुर्ची एवढेच काम केले आहे. यांना स्वप्नातही खुर्ची शिवाय काही दिसत नाही असे टीकास्त्र भाजपचे ज्येष्ठ नेते, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सोडले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह संदर्भात संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना मराठवाडा मुक्ती संग्राममध्ये अमित शहा होते का?, असे बॅनर लावण्यात आले होते. त्यावर बोलताना मग उद्धव ठाकरे त्यावेळेस होते का? असा प्रति प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी केला. कदाचित त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणत असतील. राहुल गांधी तिरंगा झेंडा फडकवतात मग त्यांचा स्वातंत्र्याच्या लढ्याशी काही संबंध आहे का? असे बोलणे आश्चर्यकारक आहे. काही लोक विषारी शब्दाचा उपयोग करतात असा टोला संजय राऊत यांना मुनगंटीवार यांनी लगावला.
इंडिया आघाडीकडे कोणताही अजेंडा नाही. ते बैठकीत राहुल गांधीच्या लग्नाची चर्चा करतात, मुख्यमंत्र्याचा हात पकडून इकडून- तिकडे पाठवतात. कुणाला खुर्ची मिळत नाही त्याच्यातून रुसवे फुगवे होतात. त्यांच्याकडे देश हिताचा कार्यक्रम नसून, देशाला मागे नेण्याचेच ते काम करत आहेत. यांना कामधंदे नाही जनतेचा हिताचा विचार नाही. केवळ पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर यांची नजर आहे.

गावित यांच्या आरोपाबाबत बोलताना ते म्हणाले की, असे आरोप सगळ्यांवर होतात राहुल गांधीवर नॅशनल हेरॉल्डचा आरोप आहे. आरोप करण्याऐवजी काही पुरावे असतील तर कोर्टात गेले पाहिजे कोर्टाची व्यवस्था आहे. काँग्रेसचा त्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का?. हेरॉल्ड प्रकरणात पुराव्यासह कोर्टात गेले तसे जावे असे सांगितले.

दरम्यान, मराठा आंदोलन संदर्भात बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात पोलिसांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये संवादातून प्रश्न सुटतात, आरक्षणाच्या बाबतीत संविधानाच्या चौकटी बाहेर सरकार म्हणून कोणतीही कृती करणार नाही. प्रश्न हे संवादातून सुटणार आहेत. खरेतर अजून कृती झालेली नसताना उपोषण करण्याची गरज नाही. यावर संवाद आणि चर्चा सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांची एकमेकांशी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कोणावर अन्याय होणार नाही असे स्पष्टपणे सांगितले आहे.

वाघ नखांची प्रतिकृती

नाना पाटेकर यांनी कुठलीही टीका केली नाही त्यांनी मला फोन करून सांगितलं मी अभिनंदन करतो. ट्वीटमध्ये लोकांनी हा देश लुटला त्याविरुद्ध कृती अपेक्षित आहे असे म्हटले असून त्यांनी सरकारवर टीका केली नाही. तुम्हाला अर्थ समजला नसेल तर त्यांना विचारू शकता असे सांगितले. वाघ नखांची प्रतिकृती याविषयीच्या शंका संदर्भात बोलताना असा प्रश्नही विचारने मला वाटतं हे आश्चर्यजनक वाटते. प्रतिकृती ही आपल्या देशातच तयार करता आली असती त्यासाठी लंडनला जाण्याची गरज नाही. विरोधी पक्षाच्या सुपीक डोक्यातून नापीक आयडिया निघतात त्याचेच आश्चर्य वाटत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

पीक विमा प्रकरण

बीड पीक विमा प्रकरणी छेडले असता सरकारी जमिनीवर पीक विमा काढल्याच्या तक्रारी असेल तर त्यावर चौकशी होईल. गृहमंत्र्यांचा जिल्हा आहे म्हणून पोलीस स्टेशन आपण बंद करत नाही. त्याचप्रमाणे पिक विमातील गैरप्रकाराचा संबंध कृषीमंत्राशी जोडणे योग्य नाही. मी माझा टाईम टेबल पाळण्यासाठी कटिबद्ध आहे. इतर नेत्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन पाहण्याची जबाबदारी माझी नाही. अजित दादा, शरद पवार यांचे पटो अथवा न पटो जनतेचा याच्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button