नागपूर, पुढारी वृत्तसेवा : अनके वर्षानंतर इंग्रजांनी तयार केलेले जाचक कायदे बदलत असल्याचा आनंद आहे. मुळात इंग्रजांनी जे कायदे तयार केले होते, ते भारतीयांना दडपून ठेवत, राज्य करण्यासाठी केले होते. अनके वर्षांपासून बदल करण्याची मागणी होती. कायद्यातील नवीन बदलामुळे दोष सिद्ध होण्याचे प्रमाण हे 90% पर्यंत जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. नागपुरातील आज सायंकाळचे विविध कार्यक्रम आणि उद्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने आले असता ते माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे मी या बदलासाठी मनापासून आभार मानतो. लोकशाही अनुरूप हे कायदे तयार केले गेलेत. त्यासोबतच नवीन युगाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे कायदे तयार झाले आहेत. आपल्या देशातील क्रिमिनल जस्टिस सिस्टीम वेळ काढूपणा आहे. तारीख पे तारीख प्रक्रियेत आणि न्याय मिळत नाही अशी ओरड होत होती. त्याला सुद्धा उत्तरदायी करण्याचे काम या कायद्यामुळे होणार आहे. एकंदरीत स्वागतार्ह अशा प्रकारचा हा बदल आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच सर्वांना शुभेच्छा देतो. सर्वत्र स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा होईल. 'हर घर तिरंगा' मागील वर्षीपासून उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्याला लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. उद्या गडचिरोलीत अनेक कार्यक्रम स्वतः घेतलेले आहेत. दुर्गम भागात मी जाणार आहे. पोलिसांसोबत त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिवस साजरा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.