

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: घोडाझरी तलावावर वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या चौघा तरुणांचा सेल्फी घेताना तलावात पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज (दि.१६ ) सायंकाळी घडली. मनीष श्रीरामे (वय २६), धीरज झाडें (वय २७), संकेत मोडक (वय २५), चेतन मांदाडे (वय १७, सर्व रा. शेगाव, ता. वरोरा) अशी बेपत्ता तरुणांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली (Chandrapur News) आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास शेगाव येथील ८ तरुण एका वाहनाने घोडाझरी तलावावर आले होते. रिपरिप पावसात निसर्गरम्य वातावरणात तरुण पर्यटनाचा आनंद घेत होते. दरम्यान, सेल्फी घेण्याच्या नादात एक तरुण तलावात पडला. त्याला वाचविण्यासाठी तिघा तरुणांनी तलावात उडी मारली. त्यामुळे चौघेही तरुण बेपत्ता झाले. उर्वरीत तरुणांनी लगेच नागभिड पोलिसांना माहिती (Chandrapur News) दिली.
मागील दोन ते तीन दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहू लागले आहेत. नागभिड तालुक्यातही संततधार पाऊस कोसळल्यामुळे घोडाझरी तलावाच्या पाणी साठ्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे घोडाझरी तलावावर पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
हेही वाचा