Chandrasekhar Bawankule: ‘केवळ हात वर करून वज्रमूठ होत नाही’; बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला | पुढारी

Chandrasekhar Bawankule: 'केवळ हात वर करून वज्रमूठ होत नाही'; बावनकुळे यांचा ठाकरेंना टोला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उध्दव ठाकरे हे शनिवार (८ जुलै) ते सोमवार (१० जुलै) दरम्यान विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. पण केवळ हात वर केल्याने वज्रमूठ होत नाही, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

उद्धव ठाकरे हे विदर्भ दौऱ्यात यवतमाळ, वाशिम, नागपूर याठिकाणी जाणार आहेत. दरम्यान ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा एकदाही नागपुरात अधिवेशन घेतले नाही. विदर्भाचा छळ केला, विदर्भ वैधानिक मंडळ बंद पाडले. त्यांनी सत्तेत असताना जनतेचा विचार केला नाही. त्यामुळे जनता हे सर्व लक्षात ठेऊन निवडणुकीत विकास करणाऱ्यांसोबत उभी राईल; असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी केले.

Chandrasekhar Bawankule: अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा

दरम्यान, अजित पवारांनी शरद पवार यांच्या जीवनाचा जो आलेख मांडला त्यावरून असे वाटते की, वेळोवेळी शरद पवारांनी भूमिका बदलल्यामुळे पक्ष अडचणीत आला आणि त्यांची विश्वासार्हता देखील कमी झाली. अजित पवारांची भूमिका देशहिताची आहे. जनतेसमोर अजित पवारांनी सत्य परिस्थिती मांडली, त्यामुळे अजित पवारांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजे. महाराष्ट्राची जनता ही विश्वास ठेवेल; असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त (Chandrasekhar Bawankule) केला.

निवडणुकीला अजून वेळ आहे. जागावाटप समंजस्यातूनच होईल. जागेवाटप संदर्भातील अधिकार माझ्याकडे नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राष्ट्रपतींना भेटून विमानतळावर त्यांचं स्वागत करुन ते गेले. आमच्यात मनभेद नाहीत. आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक बहुमत या सरकारला आहे. त्यामुळे हे सरकार सर्वाधिक पॉवरफुल आहे.

समरजीत घाटगे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता

समरजीत घाटगे यांच्या रक्तात भाजपा आहे. असा निष्ठावंत कार्यकर्ता व नेता असल्यावर काहीही प्रसंग आला, तरीही ते कधीच पक्षापासून फारकत घेऊ शकत नाहीत. पक्षाची विचारधारा पाळणारा तो कार्यकर्ता असल्याने त्यांच्याबद्दल संभ्रम करु नये. जेव्हा परिवारात मतभेद होऊन तुमचा विश्वास संपतो. तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांना सांभाळू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही राजकीय व्यक्तीने परिवारात राजकारण आणू नये असं मला वाटतं.

महायुतीमध्ये त्यांना चांगला दर्जा

बच्चू कडू नाराज आहेत का? याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले, ते अगोदर मंत्री होते, त्यामुळे त्यांना वाईट वाटू शकते. त्यांना पक्षात सध्या चांगले स्थान आहे. आम्हालाही त्यांच्या पक्षाची सहानुभूती आहे. महायुतीमध्ये त्यांना चांगला दर्जा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक निर्णय पक्षात घेतले आहेत. त्यांच्यामुळेच दिव्यांग मंत्रालयाचा निर्णय झाला. पुढे देखील मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे काहीतरी जबाबदारी देतीलच,असे देखील बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Back to top button