पतीसोबत भांडण झाल्याने मोहाडी (जि.भंडारा) येथील महिला ९ जून रोजी ममता राहुलकर (वय. ४४) (रा. मोहाडी) या महिलेच्या घरी गेली. या महिलेने फिर्यादीची आपबीती ऐकून तिला दोन दिवस आपल्या घरी ठेवले. पती तेथे विचारायला गेला असता ती घरी आलीच नाही, असे ममता राहुलकरने सांगितले. दोन दिवसानंतर तिला हरी शेंडे (वय.५५) (रा. पारडी) या व्यक्तीच्या स्वाधीन केले. हरी शेंडे याने तिला विश्वासात घेऊन ललिता दामले (रा. खैरबोडी ता . तिरोडा) हिच्या घरी नेऊन सोडले.
लाखोचा ठरला होता सौदा
१२ जून ते १९ जून पर्यंत आठ दिवस फिर्यादी महिला तेथेच होती. या काळात ललिताच्या घरी अनोळखी व्यक्ती येऊन या महिलेचा सौदा लाखो रुपयात करीत होते. हे फिर्यादीच्या लक्षात आले. तिने पळून जाण्याचा प्रयत्न केला; परंतु तिला डांबून गुंगीचे औषध दिले जात होते. तिच खोट आधार कार्ड सुद्धा तयार करण्यात आल होते.
१९ जून रात्री ललिताच्या मोबाईलवरून फिर्यादी महिलेने आपल्या पतीला फोन केला. पतीने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून संबंधित महिलेला मोहाडी येथे आणले. या प्रकरणात ममता राहुलकर, ललिता दामले व हरी शेंडे यांना अपहरण, धमकी, शिवीगाळ देणे, संगनमत करून गुन्हा करणे या आरोपाखाली अटक केली आहे. संशयितांना २६ जून पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक लोहित मतानी, उपविभागीय अधिकारी अशोक बागुल यांच्या मार्गदर्शनात, पोलीस निरीक्षक प्रदीप पुल्लरवार, पिंटू लांडगे करीत आहेत.