जालना, पुढारी वृत्तसेवा : आगामी पाच दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, तेथे कमाल तापमान 42 ते 44 अंशांवर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, येमेन, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश या भागांनाही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी गुजरात किनारपट्टीवर धडकणार असल्याने अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मान्सून 11 जून रोजी राज्यात आला. मात्र, त्याचा मुक्काम अजूनही रत्नागिरी, कोप्पल, पुट्टुपर्थी, श्रीहरिकोटा येथेच आहे. तो थोडाही पुढे सरकलेला नाही. त्याउलट मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरामार्गे पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झाली असून, त्या भागात प्रगती करीत आहे. देशाच्या पूर्व भागासह गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, बिहारमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम आहे.