शरद पवारांच्या राजीनाम्‍यानंतर चंद्रपुरात राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे | पुढारी

शरद पवारांच्या राजीनाम्‍यानंतर चंद्रपुरात राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्‍याच्या घोषणेने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पवार यांच्यानंतर त्यांचे समर्थक पदाधि‍कारी राजीनामा देत आहेत. चंद्रपूरचे जिल्ह्यध्यक्ष राजेंद्र वैद्य, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सोमानी यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, यांनी राजीनाम्‍याबाबत एक निवेदन पक्षाकडे पाठविले आहे. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्षपदी राहणार नसतील तर आम्हीसुद्धा त्या पदावर राहणार नाही. आम्ही पवार यांच्यासोबतच आहोत, त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करु, असे वैद्य यांनी स्पष्ट केले.

जवळपास दहा वर्षांपासून वैद्य चंद्रपूरच्या जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. काल (मंगळवार) मुंबईत पुस्तकाचे प्रकाशन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. याचे लोण आता जिल्हास्तरावर पोहचले आहे.

शरद पवार यांनी, निर्णय मागे घ्यावा यासाठी राज्यभरात पक्षांतर्गत राजीनामा सत्र सुरू झाले आहे. चंद्रपुरातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण कार्यकारिणीनेच राजीनामा दिला आहे. राजीनाम्याच्या घोषनेनंतर शरद पवार यांनी भाकरी बदलण्याची गरज व्यक्त केली होती. पवार साहेबांना जिल्ह्यात काही बदल करायचे असतील तर ते देखील करू शकतात, असेही वैद्य यांनी निवदेनात म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button