Samriddhi Highway : ‘समृद्धी’वरील अपघातांना ‘महामार्ग संमोहन’ ठरतेय कारण | पुढारी

Samriddhi Highway : 'समृद्धी'वरील अपघातांना ‘महामार्ग संमोहन’ ठरतेय कारण

नागपूर: पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्ग (Samriddhi Highway) वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर या महामार्गावर रोज, दिवसाआड मोठ्या प्रमाणात अपघात सुरूच आहेत. प्रादेशिक परिवहन विभागाने दंड वसुली, वाहन चलान करण्यासोबतच चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी समुपदेशन तसेच वाहनांची तपासणी करण्याची मोहिम हाती घेतली. मात्र, त्यानंतरही अपघातांचे सत्र सुरुच आहेत. या अपघातांमागे 33 टक्के महामार्ग संमोहन हे महत्वाचे कारण असल्याचे पुढे आले आहे.

नेमके महामार्ग संमोहन काय, हे जाणून घेण्यासाठी नागपुरातील व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. आपल्या अभ्यासातून त्यांनी या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. बहुतांशी अपघातांमागे ‘महामार्ग संमोहन’ हे कारण असल्याचा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे. ‘व्हीएनआयटी’ संस्थेच्या स्थापत्य अभियांत्रिकी शाखेच्या वाहतूक विभागाच्या विद्यार्थ्यांनी समृद्धी महामार्गावर तीन महिने अभ्यास केला. आपला निष्कर्ष काढला. विशेष म्हणजे आरटीओच्या अधिकाऱ्यांनीही याविषयी यापूर्वीच दुजोरा दिला आहे.

समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी दरम्यान पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर वाहनांचा प्रवासाचा वेळ कमी झाला. मात्र, सतत होणाऱ्या अपघातांमुळे चिंता वाढली. व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी महामार्गावरील शंभर किलोमीटर टप्प्यात हा अभ्यास केला. यातून बहुतांशी अपघातांमागे ‘महामार्ग संमोहन’ हे कारण पुढे आल्याचे सांगितले जाते.

Samriddhi Highway : महामार्ग संमोहन म्हणजे काय?

एखाद्या सरळ महामार्गावर कोणत्याही अडथळ्याशिवाय तुमचे वाहन एका सरळ रेषेत धावत असेल. तर चालक या परिस्थितीला सरावतो. त्यामुळे त्याची शारीरिक हालचालही स्थिर होते. मेंदू या क्रियेच्या प्रक्रियेसाठी सक्रीय नसतो. या स्थितीलाच ‘महामार्ग संमोहन’ असे म्हटले जाते. चालक आवश्यक तेवढा दक्ष राहत नाही. त्यामुळे काही सेकंदाचा बेसावधपणा देखील भीषण अपघातास कारण ठरू शकतो. खरेतर ही नवी नाही, तर जागतिक संकल्पना आहे. जगभरात या कारणापायी अपघात होतात. त्यामुळेच बराच वेळ वाहन चालविताना काही वेळ तरी ब्रेक घेणे आवश्यक असते. ‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातांना कारणीभूत ठरल्याचा विभागप्रमुख आणि या अभ्यास प्रकल्पाचे मार्गदर्शक विश्रुत लांडगे यांचा दावा आहे.

याशिवाय या महामार्गावर अनके वाहने वेगमर्यादा ओलांडत असल्याचे अभ्यासात दिसून आले. बरेचशे चालक महामार्गावर लेनचे पालन करीत नसल्यानेही अपघातांना आमंत्रण मिळत आहे. शिवाय महामार्गावर टायर फुटल्यामुळे देखील अपघात झाल्याचे दिसून आले आहे. याशिवाय आणखीही काही कारणे अपघातामागे आहेत. यामुळेच महामार्गावर चालताना हुरळून जाऊ नका, सजग रहा, आपल्यासोबतच इतरांचीही काळजी घ्या, असेच म्हणावेसे वाटते.

हेही वाचा 

Back to top button