विदर्भाला ‘ऑरेंज अलर्ट’; नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

विदर्भाला 'ऑरेंज अलर्ट'; नागपूर विभागात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर विभागात गुरुवारपासून  ( दि. १६) १९ मार्चपर्यंत वादळी वारा, गारपीटीसह अतिवृष्टीची (Heavy Rain Alert) शक्यता वर्तविण्यात आली आहे. १६ व १७ मार्च रोजी विदर्भातील नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्‍ह्यांत अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे गारपीट व वादळी पावसामुळे मनुष्य व वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे.

भारतीय हवामान विभागातर्फे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयांत गुरुवारी (दि.१६) व शुक्रवारी (दि.१७) अतिसतर्कतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. त्यासोबतच १९ मार्चपर्यंत संपूर्ण विदर्भात वादळी वारे तसेच गारांसह पावसाचा इशारा (Heavy Rain Alert) देण्यात आला आहे. भंडारा व गोंदिया जिल्हयात शुक्रवारी ( दि.१७) अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

गारांसह पडणाऱ्या वादळी पावसामुळे‍ शेतीपिके आणि फळपिकांच्या नुकसानीची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. शहरी व ग्रामीण भागात कच्ची तसेच टीनाच्या पत्र्याच्या घरांचे नुकसान होण्याची शक्यता असून, जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी सतर्क राहावे. या काळात वीजपुरवठा खंडीत होण्याची शक्यता आहे. यासोबतच दूरध्वनी लाईन व पायाभूत सुविधांची हानी होऊ शकते. वित्त व जिवीतहानी टाळण्यासाठी महसूल प्रशासनातर्फे आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button