नागपूर : आमच्याशी बावनकुळे यांनी संभाळून बोलावे – चंद्रकांत खैरे | पुढारी

नागपूर : आमच्याशी बावनकुळे यांनी संभाळून बोलावे - चंद्रकांत खैरे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना लाचार नाही, त्यामुळे ते स्वतः ओवेसींना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएम ही भाजपाचीच ‘बी’ टीम आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोडे सांभाळून बोलावे, असा सल्ला शिवसेना नेते (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. ते रविवारी विदर्भातील शिवगर्जना संपर्क यात्रेसाठी नागपुरात आले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आज राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वधर्मीय जनता आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांचा विजय होऊ दे, अशी प्रार्थना मी आज टेकडी गणेश मंदिरात केली आहे. अर्थातच सर्वोच्च न्यायालयाचा कौल सत्याच्या बाजूने म्हणजे, आम्हाला मिळाल्यानंतर या आमदारांचे काय हाल होणार? हे वेळच त्यांना दाखविणार आहे. आता आम्ही कुठल्याही परिस्थितीत थांबणार नाही. राज्यातील जनतेपुढे शिवगर्जना करीत भविष्यात जनमत मिळवणार आहोत.

आज मुस्लीम समाज आमच्याकडे मोठ्या प्रमाणात वळायला लागला असून वंचित समाजही आमच्याकडे वळत आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने भाजपाचा जळफळाट होत आहे. आपसात भांडणे कशी लावायची, हा प्रयत्न भाजप करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडबुद्धीचे राजकारण करतात. सरकारकडून विरोधकांची कामे केली जात नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षीय राजकारणात बाजुला सारल्या जात आहे, अशा अफवा त्यांच्याच गटातून येतात असे चंद्रकांत खैरे या वेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button