चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा नुकतीच शिक्षक मतदार संघाची निवडणूक पार पडली. यामध्ये सत्ताधाऱ्यांना चारीमुंड्या चित केले आहे. मतदारांचा या सरकारविरोधात राज्यात प्रचंड रोष दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल, असे संकेत माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटीवार यांनी दिले आहेत. वडाळा पैकू चिमूर येथील आधार निवासस्थानी काँग्रेस कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा नुकताच पार पडला यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री तथा आमदार विजय वड्डेटीवार, शिवानी वड्डेटीवार, माजी जि.प. सदस्य गजानन बुटके, काँग्रेसचे सक्रीय कार्यकर्ते दिवाकर निकुरे, प्रफुल्ल खापर्डे, माजी नगराध्यक्ष कात्रटवार, राजू लोणारे, सुधीर पोहणकर, कल्पना इंदूरकर, निता अंबादे, जावा शेख व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
वड्डेटीवार पुढे म्हणाले, शिक्षक मतदार संघात आमदार निवडून आणण्याची सुरूवात माझ्या घरातून झाली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी किंवा जिंकून देण्यासाठी जी कसब लागते ती काँग्रेसमध्ये आहे. पाच वर्षात आपण निवडून येतो. निवडून आल्यानंतर जनतेची सेवा करणे आपले कर्तव्य आहे. नुकत्या ज्या निवडणुका झाल्या त्याची परिस्थीत पाहिली तर पुनश्च महाराष्ट्रात काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील वातावरण बदलेले आहे. देशातील वातावरण बदलत चालले आहे. त्यामुळे जनतेच्या पाठीमागे राहून त्यांचा आशीवार्द घेणे नेत्यांचे काम आहे. मात्र सध्या मतभेद वाढवायचे काम केले जात आहे. त्यामुळे दु:ख वाटते. चिमूर मतदार संघ काँग्रेसाकरीता अनाथ झाल्यासारखा वाटतो. काँग्रेसचे कार्यकर्ते अनाथ झाले आहेत. प्रेमाचे बोलने असेल तर कुणाच्याही दरवाज्यात जाता येईल, परंतु प्रेमाचे बोलने नसेल तर कुणाच्या दरवाजात कसे जाता येईल, असा सवालही काँग्रेसच्या चिमूर मतदार संघातील नेत्यांवर विचारला. स्वत:ला मालक समजायला लागले आहेत.
तुम्हाला धनाची श्रीमंती मिळेल परंतु लोकांच्या मनातील श्रीमंती कधीच मिळू शकत नाही. ती मिळविण्याकरीता लोकांना प्रेम द्यावे लागते. चिमरच्या भूमीत मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मी जनता म्हणून नाही, तर माझ्या कुटूंबातील व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे बघीतले आहे. त्यांचे सुख-दुख आपले आहेत, या भावनेने काम मिसळून करीत होतो. पण आता चिमूर मतदार संघात अजब काम सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. मी विधानसभा चिमूर मतदार संघ सोडलेला नाही. फक्त मी प्रतिक्षा करीत आहो. लोकांचा वापर घाणेरड्या राजकारणाकरीता केला जात असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.
हेही वाचा :