वर्ध्यात आजपासून 96 वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन
वर्धा; पुढारी वृत्तसेवा : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्ध्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता साहित्य संमेलनाला प्रारंभ होत आहे.
संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, पूर्वाध्यक्ष भारत ससाणे यावेळी उपस्थित राहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, डॉ. कुमार विश्वास, विशेष
अतिथी आमदार डॉ. विश्वजित कदम, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील उपस्थित राहतील.
संमेलनादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. संमेलनस्थळाला महात्मा गांधी साहित्य नगरी असे नाव देण्यात आले आहे. वर्ध्यातील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानावर संमेलन होत आहे. संमेलनस्थळी वेगवेगळे सहा सभामंडप तयार करण्यात आले आहेत. ग्रंथप्रदर्शनाला पुस्तकाच्या आकाराचे प्रवेशद्वार निर्माण करण्यात आले आहे. संमेलनाच्या प्रवेशद्वारावर महात्मा गांधीजींचे चरख्यावर सूतकताई करतानाचे कटआऊट आकर्षक ठरत आहे. येथे सुमारे 300 ग्रंथदालने असणार आहेत. 30 स्वतंत्र स्टॉल्स आहेत.