अमरावती : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान | पुढारी

अमरावती : पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे 49.67 टक्के मतदान

अमरावती, पुढारी वृत्तसेवा : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सुमारे ४९.६७ टक्के मतदान झाले. याबाबत मतदान पथकांच्या नोंदी व दस्तऐवज यांच्या संपूर्ण तपासणीअंती अंतिम आकडेवारी जाहीर होणार आहे. २३ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. दोन फेब्रुवारी रोजी बडनेरा रोडवरील नेमानी गोडाऊन येथे मतमोजणी केली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत झाल्याचे राजकीय चित्र आहे.

या निवडणूकीत एकूण २३ उमेदवार निवडणूक लढत आहेत. अमरावती पदवीधर मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदानाला आज सकाळी ८ वाजेपासून सुरुवात झाली सकाळी १० वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी ५.४९ टक्के मतदान झाले. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात ७५ मतदान केंद्रावर ४.२५ टक्के, अकोला जिल्ह्यात ६१ मतदान केंद्रावर ५.५३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रावर ६.३८ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रावर ५.७८ टक्के, वाशिम जिल्ह्यात २६ मतदान केंद्रावर ७.४२ टक्के मतदान झाले.

दुपारी १२ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात १३.६९ टक्के, अकोला जिल्ह्यात १४.६५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात १७.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात १८.०७ टक्के तर वाशीम १९.३९ टक्के मतदान झाले आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी १५.९४ टक्के मतदान झाले. दुपारी २ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात २६.१५ टक्के, अकोला जिल्ह्यात २८.४५ टक्के, बुलडाणा जिल्ह्यात ३३.४७ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ३५.६० टक्के तर वाशीम जिल्ह्यात ३४.३७ टक्के मतदान झाले आहे. दुपारी २ वाजेपर्यंत सर्व जिल्ह्यांमध्ये २६२ मतदान केंद्रावर सरासरी ३०.४० टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली. दुपारी ४ वाजेपर्यंत अमरावती जिल्ह्यात ४३.३७, अकोला जिल्ह्यात ४६.९१, बुलडाणा जिल्ह्यात ५३.०४, वाशिम जिल्ह्यात ५४.८०, यवतमाळ जिल्ह्यात ५८.८७ असे एकूण ४९.६७ टक्के अंदाजे मतदान झाले.

२३ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगांबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम आधी २३ उमेदवारांचा समावेश आहे.

भाजप उमेदवारावर गुन्हा दाखल

भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश भवन येथे आयोजित मेळाव्यात डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विजयासाठी आवाहन करणारी भाषणे देण्यात आली होती. २८ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता प्रचार तोफा थंडावल्या. त्यानंतर देखील युवा स्वाभिमानच्या वतीने महेश भवन येथे आयोजित रणजीत पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला होता. याबाबत फिरत्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर प्रचार प्रमुख डी.जे. गावणे यांनी आचारसंहिता भंगाची राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार राजापेठ पोलिसांनी डॉक्टर रणजीत पाटील यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला.

हेही वाचंलत का?

Back to top button