

नागपूर; चंदन शिरवाळे : भाजपची सभागृहात कोंडी करण्याच्या हेतूने एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेत पाठविले असले तरी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपने खडसे यांना बोलण्यापासून दोन वेळा रोखले. विशेष म्हणजे, खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अलीकडचे राजकीय वैरी असले तरी त्यांनी 'नाथाभाऊ' असा आदरपूर्वक उल्लेख करत नियमानुसार
तूर्तास तुम्हाला बोलता येणार नसल्याचे स्पष्ट केले. खडसे यांनीही फडणवीस यांचा सन्मान राखला आणि ते आसनस्थ झाले.
विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी सोमवारी दुपारी 12 वाजता कामकाजाला सुरुवात केली असता, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावरून सीमाभागातील मराठी लोकांवर अन्याय होत असल्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. कर्नाटक सरकार बेळगावमध्ये मराठी भाषिकांना आंदोलन करू देत नाहीत, असे सांगत सीमाप्रश्नावर चर्चा करण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य शशिकांत शिंदे यांनीही सीमेवर वातावरण तणावाचे असल्याचे सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली असतानाही कर्नाटकमधील जनतेकडून मराठी बांधवांवर अन्याय सुरू आहेत. त्यामुळे आपण मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याचा संदेश जाऊ देण्यासाठी सभागृहात सीमाप्रश्नावर चर्चा झाली पाहिजे, अशी भावना शिंदे यांनी मांडली.
त्यावर उपासभापती डॉ. गोर्हे यांनी हस्तक्षेप केला. त्या म्हणाल्या, सीमाप्रश्नी आपण मराठी बांधवांच्या पाठीशी असल्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री प्रस्ताव मांडणार आहेत. कामकाज सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाले असल्याचेही गोर्हे यांनी सांगून चर्चेस नकार दिला.