Accident : नागपूर महामार्गावर दुचाकीस्वारांचा अपघात; एक ठार | पुढारी

Accident : नागपूर महामार्गावर दुचाकीस्वारांचा अपघात; एक ठार

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : नागपूर महामार्गावर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला स्कार्पिओची जबर धडक होवून हा अपघात झाला. ही घटना रविवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास नागपूर महामार्गावर भद्रावती शहरातील पॉवर ग्रीड जवळ घडली.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शंकर धोंडू निकुरे (वय ५०, रा. जळका ता. वरोरा) आणि कार्तिक वसंत मोहुर्ले (दि. २४, रा. खरवड ता. वरोरा) हे दोघेजण पाहुण्यांकडे जात होते. रविवारी सकाळी दुचाकीने (क्र. एम.एच.३४ बी.डब्ल्यू. ३४४९) चंद्रपूरला जात होते. दरम्यान, भद्रावतीच्या पॉवरग्रीड जवळ येताच मोहबाळा येथील वळणावर असताना चारचाकीने (क्र. एम.एच.०५ सी. एम. १५१४) दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील मागे बसलेले शंकर निकुरे हे जागीच ठार झाले. तर दुचाकी चालक कार्तिक मोहुर्ले हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्याला चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटेनेची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक अमोल तुळजेवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन जखमीला रुग्णालयात हलविले. तर मृतास शवविच्छेदनाकरिता येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. अपघातातील चारचाकी तालुक्यातील चालबर्डी येथील असून सूरज ढाकणे यांच्या मालकीची असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी चालकाला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी झालेले तीन अपघात

दरम्यान, दुचाकीला धडक दिल्याने एक ठार, एक जखमी होण्याची ही भद्रावती शहरातील १४ दिवसातील तिसरी आणि तालुक्यातील चौथी घटना आहे. ३० ऑक्टोबर रोजी गवराळा रस्त्यावर कुसना वेकोलि वसाहतीतील गोवर्धन खडसे आणि आशा खडसे यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये आशा खडसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यांचे पती गोवर्धन खडसे यांचे दोन दिवसानंतर निधन झाले होते. त्यानंतर

७ नोव्हेंबर रोजी माजरी येथील राजेश मोतीलाल पिसे यांच्या दुचाकीला नवीन कोंढा गावाजवळ कारने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले होते. पत्नी रोशनी, दोन मुलींसह जखमी झाली होती.

८ नोव्हेंबर रोजी मानोरा फाट्यावर दोन दुचाकींची धडक होऊन भद्रावतीच्या किल्ला वार्डातील रहिवासी डोमाजी गोविंदा टोंगे हे जागीच ठार झाले होते. तर त्यांच्या पत्नी तुळसाबाई ह्या जखमी झाल्या होत्या. पोलिस प्रशासनाने अपघाताच्या घटना आटोक्यात आणण्याकरीता आवश्यक ते प्रयत्न करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

 

हेही वाचा

Back to top button