काँग्रेसला ‘भारत जोडो’ पेक्षा ‘पार्टी जोडो’ची गरज : सुधीर मुनगंटीवार
नागपूर: पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करीत असताना भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. भाजप नेते व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसला भारत जोडोपेक्षा स्वतःची पार्टी जोडो कार्यक्रमाची गरज असल्याची उपरोधिक टीका केला आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, भारत जोडोसाठी राहुल गांधी निघाले आहेत. त्यांचे स्वागतच केले पाहिजे. कारण ज्या भागातून त्यांचा प्रवास होत आहे. त्या भागात भाजपला मोठे यश मिळत आहे. किंबहुना भाजपला मजबूत करण्यासाठी त्यांची ही यात्रा असल्याचा अनुभव येत आहे.
अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरात मध्यावधी निवडणुकीचे भाकित करण्यात आले आहे. याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार म्हणाले की, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना टिकविण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसराव्या लागतात. मध्यावधी निवडणुका होतील, असे सांगून कार्यकर्त्यांना पक्षात थांबविण्याचा हा अपयशी मार्ग आहे. पण ना मध्यावधी निवडणुका होणार, ना हे सरकार पडणार. हे सरकार २०२४ पर्यंत टिकणार आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी यावेळी केला.
हेही वाचलंत का ?