नागपूर : मालगाडीचे २० डबे रूळावरून घसरले | पुढारी

नागपूर : मालगाडीचे २० डबे रूळावरून घसरले

पुढारी ऑनलाईन डेस्क : ऐन दिवाळीच्या दिवशी अमरावती नजीक मालखेड टिमटाला दरम्यान रेल्वे अपघाताची घटना घडली आहे. रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड रेल्वे मार्गावर कोळसा घेऊन जाणारे मालगाडीचे २० डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.

या संदर्भात रेल्वेच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा टीमटाला ते मालखेड दरम्यान मुख्य रेल्वे मार्गावर कोळसा घेऊन जाणारे मालगाडीचे २० डबे इंजिनसह रुळावरून घसरले. रेल्वे रुळावरून घसरल्यामुळे मोठा आवाज झाला. एकापाठोपाठ रेल्वेचे २० डबे रुळावरून खाली घसरल्याने मालगाडीचे इंजिन रुळाच्या बाजूला कोसळले. तर काही डबे रुळावर आडवे झाले. यामुळे नागपूर, मुंबई जाणारी वाहतूक नरखेड मार्गे वळवण्यात आली आहे. रेल्वे डबे रुळावरून बाजूला करण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक गाड्या नरखेड मार्गे वळवण्यात आल्या आहे. रेल्वेच्या नागपूर डिव्हिजनमध्ये ही घटना घडली आहे. घटनास्थळी रेल्वेचे कर्मचारी पोहोचले असून युद्धपातळीवर रेल्वे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या अपघातामुळे आज नागपूर मुंबई रेल्वे मार्गावरील सहा गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Back to top button