नागपूर : माथनी-मौदा पुलावर कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू | पुढारी

नागपूर : माथनी-मौदा पुलावर कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नागपूर तालुक्यातील माथनी-मौदा नदी पुलावर घडली. भारती राजू तिजारे (वय ३५, रा. चिरव्हा ता.मौदा) असे मृत महिलेचे नाव आहे. या अपघातात चौघे गंभीर जखमी असून त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

राजू तिजारे (वय ४०), सिद्धेश्वरी तिजारे (वय ८) आणि कृष्णराज तिजारे (वय १२) अशी जखमींची नावे असून सर्व चिरव्हा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तिजोरे हे पत्नी आणि दोन मुलांसह दुचाकीने नागपूर कडून येत होते. मौदा येथील माथनी पुलावर येताच मागून येणाऱ्या स्विफ्ट डिझायरने (एमएच ३५ AG ९१६०) दुचाकीला धडक दिली. कारच्या धडकेने दुचाकीवरील भारती तिजारे पुलावरून खाली पडल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर राजू व त्याची दोन मुले गंभीर जखमी झाले. त्यांना नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कारमध्ये चार ते पाच जण होते. घटनेनंतर सर्वजण वाहन सोडून पळून गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी मौदा पोलिसांनी हिट अँड रनचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा :

Back to top button