मी अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणं मतदान केलं, राऊतांच्या ‘गद्दारी’ आरोपाला देवेंद्र भुयारांचे प्रत्युत्तर | पुढारी

मी अजित पवारांनी सांगितल्याप्रमाणं मतदान केलं, राऊतांच्या ‘गद्दारी’ आरोपाला देवेंद्र भुयारांचे प्रत्युत्तर

नागपूर ; पुढारी वृत्तसेवा मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली. असा सवाल मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे. नागपूर विमानतळावर एका खासगी वृत्तवाहिनी सोबत बोलताना भुयार यांनी हा सवाल केला आहे. काल संजय राऊत यांनी ज्या अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर गद्दारी केल्याचा आरोप केला, तेच देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, संजय राऊत यांच्या बद्दल शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी गेले आहेत.

भुयार म्हणाले की, मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून आघाडीशी जोडलेला आहे, मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करत असून, संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती ना असा सवाल त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

संजय राऊत यांचं चुकतंय, ते खूप मोठे नेते आहेत, मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचे मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचे मत संजय राऊत यांना दिलं. शिवसेनेचं नियोजन चुकलं, शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केलेला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या तर त्या प्रमाणे मतदान केले. शरद पवारांना भेटून सांगणार आहे की, प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल, तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलेलो आहोत. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही.

संबंधित बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल. हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही. तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही. मुख्यमंत्री कधीच भेटत नाहीत. अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाहीत. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही. तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार. मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत आहे. असे भुयार म्हणाले.

हे ही वाचलंत का?  

Back to top button