Heat Wave In Vidarbha : विदर्भात उष्णतेचा तीव्र लाटेचा अलर्ट; पुढील ५ दिवस महत्त्वाचे | पुढारी

Heat Wave In Vidarbha : विदर्भात उष्णतेचा तीव्र लाटेचा अलर्ट; पुढील ५ दिवस महत्त्वाचे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विदर्भात (Heat Wave In Vidarbha) दररोज सूर्याचा प्रकोप सुरु आहे. उन्हाची भट्टी चांगलीच तापली असून खूप गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, असा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. शनिवार ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत विदर्भातील काही भागात उष्णतेच्या तीव्र लाटा येण्याची शक्यता असल्याचे ट्विट पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी केले आहे. चंद्रपूरची नोंद देशातील पाचवे हॉट शहर म्हणून झाली आहे. तर चंद्रपूरचे राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

चार शहरांना ऑरेंज अलर्ट (Heat Wave In Vidarbha)

सध्या विदर्भात उष्णतेच्या लाटांनी होरपळून जाईल असे वातावरण आहे. सकाळी ९ पासूनच रणरणत्या उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांमध्ये शनिवारपासून तापमान वाढत राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि अकोला या चार जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील उष्णतेचा पारा सध्या ४४ अंशाच्या पुढे सरकला आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

विदर्भातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) (Heat Wave In Vidarbha)

  • अकोला – ४५.८
  • अमरावती – ४५
  • बुलडाणा – ४२.८
  • ब्रम्हपुरी – ४५.६
  • चंद्रपूर – ४६.४
  • गडचिरोली – ४२.४
  • गोंदिया – ४३.८
  • नागपूर – ४५.२
  • वर्धा – ४५.५
  • वाशिम – ४३.५
  • यवतमाळ – ४५.२

कृषी सल्ला (Heat Wave In Vidarbha)

उष्णतेची लाट राहण्याची शक्यता लक्षात घेता फळबागा, भाजीपाला व उन्हाळी पिकांना गरजेनुसार हलके व वारंवार ओले करावे. जनावरांना थंड व स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. बैल व पशुधनाकडून सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेदरम्यान काम करणे टाळावे. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याच्या छतावर गवताचे आच्छादन करावे. शेड सिमेंट किंवा पत्र्याचे असल्यास त्यास पांढरा रंग द्यावा. शक्य असल्यास जनावरांच्या शेडमध्ये पंखे किंवा फोगर्सचा वापर करावा. जनावरांच्या आहारामध्ये हिरवा चारा, प्रथिनयुक्त, खनिज मिश्रण व मीठ युक्त खाद्य द्यावे.

जनावरांना सकाळी किंवा संध्याकाळी चरावयास सोडावे. कुक्कुट पालन शेडमध्ये पडद्याचा वापर करावा व शेडमध्ये हवा खेळती राहिल याची काळजी घ्यावी. शेतकरी व शेतमजूर यांनी शेतात काम करताना पुरेसे पाणी प्यावे तसेच प्रखर सूर्य प्रकाश असताना दुपारच्या वेळी काम करणे टाळावे. ऊस, उन्हाळी भुईमुग, तीळ व मुग या पिकांना जमिनीतील उपलब्ध ओलावा व पिकाची गरज लक्षात घेऊन ६ ते ७ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे. उन्हाळी भाजीपाला पिकाचे उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी ग्रीन शेड नेटचा वापर करावा, असा सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांनी दिला आहे

Back to top button