ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत आणि ते अस्वस्थ होऊन हल्ले करताहेत; देवेंद्र फडणवीस यांची टीका
पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या मुंबईतल्या कांदिवलीमधील पोलखोल सभेच्या स्टेजची शिवसैनिकांनी केलेल्या तोडफोड प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. पोलखोल आम्ही रोज करतोय. ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत. अस्वस्थ होऊन ते हल्ले करत आहेत. असा आरोप फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकार परिषदेत बोलत असताना केला. पुढे ते असेही म्हणाले की, ही पोलखोल कोणी कितीही विरोध केला तरी थांबणार नाही.
शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नागपूर दौऱ्यावर बोलत असताना “राऊत हे वारंवार नागपुरात आले तर त्यांना सुबुद्ध येईल” अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली.
दरम्यान, अचलपूर दंगलीवर बोलत असताना ते म्हणाले की, अमरावती जिल्ह्यात पोलिसांचे इंग्रजांप्रमाणे काम चालू आहे. विशेषत: त्याठिकाणी सरकारचे मंत्री लांगूलचालनाचे काम करत आहेत. त्यातून ही परिस्थिती बिकट बनत चालली आहे. या लांगूलचालनामुळे दोन समाज एकमेकांसमोर उभी होत आहेत. पोलिसांनी यामध्ये जात पात न पाहता कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा