भिवंडी; पुढारी वृत्तसेवा : शासनाने डिजिटल इंडियाच्या कितीही घोषणा केल्यानंतर ही कित्येक वेळा तांत्रिक अडचणींमुळे डिजिटलायझेशन गोत्यात येते याचा प्रत्यय कित्येक वेळा आपणाला येतो.
महाऑनलाईन पोर्टल हे सर्व्हर मागील आठ दिवसांपासून कासवगतीने चालत असल्याने भिवंडी सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसह पालकांचा हिरमोड होत आहे. ऐन शाळा प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला,जातीचा दाखला,अधिवास दाखला, नॉन क्रिमिलेअर दाखला यांची आवश्यकता भासते परंतु सर्व्हर डाऊन झाल्याने दाखले देण्यास सेतू कार्यालयातील कर्मचारी असमर्थता बोलून दाखवीत असल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.वेळेत दाखले न मिळाल्याने प्रवेशापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त केली जात असताना असे झाल्यास त्यास जबाबदार कोणाला धरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, तर याबाबत नायब तहसीलदार गोरख फडतरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व्हर डाऊन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी सेतू कार्यालयातील कर्मचारी रात्री उशिरा थांबून दाखले बनवीत आहेत.