ठाणे; पुढारी वृत्तसेवा : नारळी पौर्णिमेनिमित्ताने कळवा येथील खाडीजवळ विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे भाविकांची मोठी गर्दी कळवा पूलावर होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत ठाणे शहरात वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत. या कालावधीत कळवा पूल वाहतूकीसाठी बंद असणार आहे. येथील वाहतूक कोर्टनाका, पूर्व द्रुतगती महामार्ग, साकेत पूल मार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कळवा येथील कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्ताने कोळी समाजाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत
असते. करोनामुळे मागील दोन वर्ष येथे साध्या पद्धतीने उत्सव साजरा केला गेला. आता करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्याचे चित्र
असून उत्सव साजरा करण्यासाठी मोठी गर्दी या भागात होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून
येथील वाहतूक बदल करून वाहतूक पर्यायी मार्गे वळविली आहे. गुरुवारी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे बदल लागू करण्यात आले आहे.