ठाणे; पुढारी वृत्तसेवा : गंधार संस्थेच्या वतीने देण्यात येणार्या गंधार जीवनगौरव पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची, तर गंधार गौरवसाठी प्रसिध्द अभिनेते अतुल परचुरे यांची निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार सोहळा यंदा बालदिनी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती प्रसिध्द नाटककार, दिग्दर्शक अशोक समेळ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी व अतुल परचुरेही उपस्थित होते. बालप्रेक्षक खरेच खूप छान असतात. मला त्यांच्याशी संवाद साधायला आवडतो. त्यांच्याशी माझी गट्टीही जमते, असे अतुल परचुरे यावेळी म्हणाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी प्रास्ताविक केले.
ज्येष्ठ दिग्दर्शक विजयाताई मेहता, सई परांजपे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर काम करतानाच्या आठवणी नाडकर्णी यांनी सांगितल्या. विजयाबाई मेहतांबरोबर काम करणारा माणूस परिपूर्णच होतो, असा स्वानुभवही त्यांनी सांगितला. त्या स्वतः वक्तशीर आहेत, त्या खूप मेहनत घेतात. मी त्यांच्याबरोबर महासागर आणि दोन नाटकांत कामे केली आहेत. प्रेक्षक आहेत, तर कलाकार आहेत, म्हणून मी कायमच प्रेक्षकांचेच आभार मानते, अशी भावनाही नाडकर्णी यांनी व्यक्त केली.