सापाड (डोंबिवली ) : योगेश गोडे : कल्याण शहरात शुक्रवार दुपारी झालेल्या अर्धा तासाच्या पावसात कल्याण-डोंबिवली तुंबल्यामुळे पालिकेच्या नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. ठेकेदारांकडून नालेसफाईच्या नावाखाली शहराच्या तोंडाला पाने पुसण्याची कामे केल्यामुळे शहरात पावसाचे पाणी रस्त्यावर साचून जागोजागी चिखल साचला होता.
कल्याण शहर आणि परिसरात आज दुपारी सुरू झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील रस्त्यांवर चिखलाचे तळी साचली आहेत. पावसाचे पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या गटारामध्ये प्लास्टिक आणि कचरा साचला आहे. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होत असून रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चिखलाचे तळे रस्त्यावर तयार झाले आहेत.
या साचलेल्या चिखलाच्या पाण्यातून प्रवास करणे धोक्याचे होऊन बसल्याने प्रवाशांना पाण्यातून प्रवास करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. शहरातील रस्ते वारंवार दुरुस्तीमुळे रस्त्याची उंची वाढत गेली, मात्र रस्त्याशेजारील घरांची उंची कमी-कमी होत गेल्यामुळे सखल भागातील नागरिकांच्या घरांमध्ये चिखलाचे पाणी शिरून रहिवाशांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकत्याच झालेल्या पावसाने नालेसफाईची पोलखोल केली असल्यामुळे पालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरला आहे. त्यामुळे नालेसफाईवर खर्च करण्यात आलेले करोडो रुपये पाण्यात गेल्याच्या चर्चांना पालिका वर्तुळात उधाण आले आहे. पावसाने शहरात पहिली हजेरी लावताच संपूर्ण व्यवस्था कोलमडण्याचा प्रकार कल्याण शहराला नवा नाही. रस्ते, नाले आणि इतर पायाभूत सुविधांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. तसेच, पावसाळापूर्व कामांसाठी त्यावर पुन्हा खर्चाचे आलेख चढवले जातात, तरीही एकूण व्यवस्थेमध्ये सुरू झालेला संततधार पावसामुळे शहराच्या अनेक भागांतील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.
परिणामी साचलेल्या पाण्यातून रस्त्यावरून प्रवास करणे धोक्याचे झाले होते. पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरला नव्हता. रस्त्यावर साचलेले पाणी सखल भागात रहिवाशांच्या घरात शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले आहे. हीच परिस्थिती पावसाळाभर राहिली तर घरात राहणे धोक्याचे होईल. त्यामुळे तत्काळ शहरातील लहान-मोठे नाले साफ करून पावसाच्या पाण्याचा मार्ग मोकळा करून घ्यावा, अशी मागणी पीडित नागरिकांकडून करण्यात आली आहे.अर्ध्या तासाच्या पावसातच कल्याण-डोंबिवली तुंबली