

भिवंडी : भिवंडी पालिका सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक 30 नगरसेवक निवडून सर्वात मोठा पक्ष तर त्याखालोखाल 22 नगरसेवक निवडून आणले. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेस व भाजपा कडून मोर्चे बांधणी सुरू केली गेली. परंतु या सर्व चर्चा मागे सारत 3 सदस्य निवडणून आलेल्या भिवंडी विकास आघाडीचे माजी महापौर जावेद दळवी व 4 सदस्य निवडून आणलेल्या कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास आर पाटील यांच्याच नावांची चर्चा अधिक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या निमित्ताने भिवंडीत पुन्हा एकदा घोडेबाजार होणार, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पालिकेत 30 सदस्य असलेल्या काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 12 व समाजवादी पक्षाचे 6 अशा 48 सदस्यांची मोट बांधत भिवंडी सेक्युलर फ्रंट ची स्थापना केली. तर 22 सदस्य आलेल्या भाजपाने शिंदे सेनेचे 12 एक अपक्षासह 35 जणांची जमवाजमव करण्यात यशस्वी झाले आहेत. भाजपा साठी बहुमताचा आकडा गाठण अवघड झाले आहे.त्यामुळे माजी महापौर जावेद दळवी यांच्या नेतृत्वाखालील भिवंडी विकास आघाडी च्या तीन तर माजी महापौर विलास आर पाटील यांच्या नेतृत्वाखालील कोणार्क विकास आघाडीच्या चार सदस्यांचे महत्व वाढले आहे. मागील वेळी बंडखोरी केलेल्या काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई झाल्याच्या धास्तीने यावेळी काँग्रेस फुटीचा शक्यता कमीच आहे.
भाजपा सोबत समाजवादी पक्ष अथवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हातमिळवणी करण्याची शक्यता कठीण आहे.तर शहरात समाजवादी पक्षाच्या उमेदवारांविरोधात जोरदार प्रचार करून अनेकांचे पानिपत करणाऱ्या आमदार रईस शेख सोबत जाण्यास समाजवादी पक्षाचे नगरसेवक तयार नसून त्यांनी स्वतंत्र सहा जणांच्या गटाची नोंद कोकण भवन येथे केली आहे. तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील 36 नगरसेवक हे निवडून आणण्यात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे योगदान मोठे असल्याने ते त्यांच्या शब्दाबाहेर असणार नाहीत. त्यामुळे सत्ता स्थापनेचे समीकरण जुळवून आणण्यासाठी समाजवादी पक्षाचे 6, कोणार्क विकास आघाडीचे 4 तर भिवंडी विकास आघाडीचे 3 या सदस्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
महानगरपालिकेच्या वीस वर्षांच्या राजकारणावर जावेद दळवी व विलास पाटील यांचा प्रभाव अधिक असून हिंदू मुस्लिम या दोन्ही समाजातील नगरसेवकांचा पाठिंबा त्यांना असल्याने त्यांच्या नावांची चर्चा अधिक आहे. तर शिंदे सेना, भाजपा व समाजवादी पक्षातील नगरसेवक सुद्धा जावेद दळवी यांच्या नावाला पसंती देऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा पालिका महापौर निवडीसाठी घोडेबाजार होणार असून त्यामध्ये फुटलेला भाव अनेकांची भंबेरी उडवणारा आहे.