उल्हासनगर: उल्हासनगर येथील सुभाष टेकडी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका सराईत गुंडावर तीन ते चार जणांनी जीवघेणा हल्ला केला. ही धक्कादायक घटना रात्रीच्या सुमारास घडली. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या रोहित जगदाळे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रोहित जगदाळे हा रात्री सुभाष टेकडी परिसरात असताना तीन ते चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी त्याला बेदम मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या रोहित याला येथील मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान रोहित याच्यावर झालेला हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाल्याचे समजते. रात्रीच्या सुमारास तीन ते चार जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. त्याच्यावर करण्यात आलेल्या जीवघेण्या हल्ल्यामध्ये उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून, विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपास मोहीम सुरू केली आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तसेच प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेऊन या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, तसेच हल्ल्यामध्ये एकूण किती जण सहभागी होते आणि पूर्ववैमनस्याचे स्वरूप काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके कार्यरत असून, तपासानंतर या हत्येप्रकरणी अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.