

ठाणे: ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी ४ ऑगस्ट रोजी निवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यासाठी शुक्रवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये आठ प्रभाग समिती अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. विरोधात कोणीच अर्ज दाखल न केल्याने या सात प्रभाग समितींवर शिवसेनेचीच वर्णी लागली आहे.
तर एका प्रभाग समितीवर भाजपची वर्णी लागली आहे. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि एमआयएममध्ये चुरस कायम आहे. या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार असून या ठिकाणी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तब्बल पाच वर्षांनी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असून या ठिकाणी शिवसेनेचा महापौर बसला. तर उपमहापौरपदी भाजपची वर्णी लागली असून इतर महत्वाची पदे देखील संख्याबळाच्या जोरावर शिवसेनेने आपल्या ताब्यात घेतली आहे. स्थायी समिती सदस्य आणि सभापतीची निवडणूक अद्याप झाली नसून त्यापूर्वी प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले.
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नौपाडा कोपरी प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदाकारिता शिवसेनेच्या मिनल संखे, वागळे प्रभाग समितीच्यासाठी एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समितीकरिता निर्मला कणसे, कळवा प्रभाग समिती साठी विजया लासे, दिवा प्रभाग समितीसाठी दिपक जाधव, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती साठी सिद्धार्थ ओवळेकर आणि वर्तकनगर प्रभाग समिती साठी जयश्री डेव्हिड या शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज दखल केला, तर उथळसर प्रभाग समिती करिता भाजपचे नारायण पवार याचे एकमेव उमेदवारी अर्ज दखल केला.
ठामपच्या सात प्रभाग समिती मध्ये शिवसेनेचे संख्याबळ आहे त्यामुळे या प्रभाग समिती मध्ये अन्य कोणत्याही पक्षाच्या नगरसेवकणी उमेदवारी अर्ज दखल केला नाही तर उथलसर प्रभाग समिती मध्ये भाजपचे सर्वाधिक सदस्य असल्याने या प्रभाग समितीच्या अध्यक्ष पदी भाजपचे नारायण पवार हे बिनविरोध निवडून येणार असून पक्षाने त्यांना वाढदिवसाची भेट दिली आहे.
मुंब्रा प्रभाग समिती करिता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दीपाली भगत आणि एमआयएम च्या नफिसा अन्सारी यांच्यात सामना होणार आहे. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे सर्वाधिक नऊ सदस्य आहेत तर एमआयएम कडे पाच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडे दोन असे संख्याबळ असल्याने या प्रभाग समितीमध्ये होणाऱ्या लढतिकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.