

ठाणेमतदार याद्या विशेष सखोल पुनरीक्षणास शहरी भागातील मतदारांचा निरुत्साह, स्थलांतर, अन्य राज्यातील मतदारांमुळे कमी प्रतिसाद मिळाल्याने ठाणे जिल्ह्यात ५३.३१ टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ८ लाख ९३ हजार मतदार वगळले जाणार असल्याने नागरिकांनी १७ ऑगस्टपर्यंत गणना प्रपत्रे दाखल करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील एसआयआरच्या कामाची माहिती देण्यासाठी आज घेतलेले पत्रकार परिषेदेमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी राजकीय पक्षांना जास्तीतजास्त नागरिकांचे अर्ज भरण्यास पुढाकार घेण्यास साद घातली आहे.
राज्यातील विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रगती विचारात घेता अर्ज भरण्यास १७ ऑगस्टपर्यंत मुदत वाढ देण्यात आली. या कालावधीत मतदारांनी गणना प्रपत्रे दाखल करावे अन्यथा मतदार यादीतून नावे वगळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यातील ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांपैकी ६६ लाख ४९ हजार ७५३ मतदारांना गणना प्रपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. उर्वरित सुमारे ८ लाख मतदारांना गणना प्रपत्रे वितरित करण्यात आली नसल्याने ती वगळलीच जातील.
त्यामध्ये सर्वाधिक २७ टक्के मतदार हे कल्याण पश्चिम आणि अंबरनाथ मतदार संघातील २५ टक्के मतदार तर २० टक्के मतदार हे भिवंडी पश्चिम मतदार संघातील आहेत. ठाणे विधानसभेचा आकडा १२ टक्के असून कल्याण पुर्वेतील १७ टक्के मतदार आहेत.
ठाणे जिल्ह्यातील ३९ लाख ७१ हजार ९८९ मतदारांचे म्हणजे ५३.३१ टक्के अर्जच डिजिटाइजेशन झाले आहेत. तर १२ लाख ३३ हजार ४६५ अर्ज असून जमा झालेले नाहीत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी दिली. जिल्ह्यात ९३ हजार ४०८ दुबार मतदार असून ही नावे वगळली अथवा गैरहजर या श्रेणीत जातील असेही त्यांनी सांगितले.
त्यामुळे जिल्ह्यातील ८ लाख ९३ हजार ४०८ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली अथवा गैरहजर म्हटले जातील, असे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. पांचाळ यांनी सांगून सर्व मतदारांनी मुदतीत अर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.
यासाठी सर्व राजकीय पक्षांनी अधिक जनजागृती करून मतदारांना गणना प्रपत्रे भरून घ्यावीत, अन्यथा मतदारांची नावे यादीतून वगळली जातील. ज्या भागात कमी एसआयआर झाले अशा अंबरनाथ (५०.९५ टक्के) कल्याण वेस्ट (५३.०८) कल्याण पूर्व (५२.९३), डोंबिवली (५४.६० टक्के), ठाणे शहर (६१ टक्के ) आणि उल्हासनगर (६५ टक्के ) या विधानसभांवर अधिक भर दिला जाणार आहे.
अन्य राज्यात मतदार असल्याने अर्ज भरले नाही
ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या स्थलांतरित बिहार, राजस्थान आदी निवडणुका होऊ घातलेल्या अन्य राज्यातील मतदारांनी मॅपिंग केलेले नाही. दोन्ही ठिकाणी मतदार असल्याने गावाला मतदान करण्यासाठी गणना प्रपत्र भरली नाहीत. त्यांनीच मनाई करीत एसआयआर प्रक्रियेत भाग घेतला नाही. अनेकांनी अर्ज घेतले मात्र सादर केले नाही. त्यामुळे ही टक्केवारी कमी दिसत असल्याचे ही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगतिले.