![Thane: Tree fell on Shirsad-Ambadi road, traffic stopped](http://media.assettype.com/pudharinews%2F2024-07%2Fec99bbbc-4de3-45c3-acb1-20759b73eae5%2FWhatsApp_Image_2024_07_02_at_10_46_33.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी वृत्तसेवा :
वसई तालुक्यातील मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडणाऱ्या शिरसाड-अंबाडी मार्गाच्या शिरसाड नाक्यावर आज (मंगळवार) सकाळी जोरदार वादळी वाऱ्याच्या पावसात या मार्गावरील एक अजस्त्र झाड कोसळले. यामुळे या मार्गावरील वाहतूक हे झाड हटवण्यात येईपर्यंत ठप्प झाली होती. सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या दरम्यान झालेल्या या घटनेमुळे त्याच वेळी कामावर जाणाऱ्या कामगारांचा खोळंबा झाला.
या भागातून खूप मोठया संख्येने कामगार वर्ग हा वसई, सतीवली, वसई फाटा, रेंज नाका, गोखीवरे, विरार या भागात असलेल्या कारखान्यांमध्ये कामासाठी जातो. यामध्ये महिलांची संख्याही अफाट आहे. भिवंडी, वाडा, पालघर या तालुक्याच्या भागाला मध्यवर्ती असलेला शिरसाड नाका हा जवळपास 18 तास माणसांच्या वर्दळीचा असतो. सकाळची वेळ असल्याने येथे मोठी वर्दळ असताना सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.
झाड भर रस्त्यात कोसळल्याचे वृत्त समजताच मांडवी पोलीस आणि संबंधित प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर झाड हटवण्याचे काम करून सुमारे दोन तासांनी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली. दै पुढारीच्या माध्यमातून वेळोवेळी या मार्गावर असलेल्या जुन्या शंभरी गाठलेल्या धोकादायक अजस्त्र झाडांची छाटणी पावसापूर्वी करण्यात यावी म्हणून वृत्त प्रसारित केले होते. याचा परिणाम प्रशासनाने काही झाडांची छाटणी केली होती.