

ठाणे : ठाणे शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण अर्थात आणि क्लस्टर प्रकल्पांच्या आढावा बैठकीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रखडलेल्या प्रकल्पांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही एस आर ए प्रकल्पांना तब्बल १५ ते १८ वर्षे लागतात, ही बाब गंभीर असून, हे प्रकल्प नागरिकांच्या हितासाठी आहेत की केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रकल्प रखडल्याने नागरिकांच्या अनेक तक्रारी आमदार म्हणून आमच्याकडे येतात; त्यांना काय उत्तर द्यायचे, अशी खंतही सरनाईक यांनी व्यक्त केली.
एस आर ए प्रकल्पांमध्ये विकासकांकडून कामे अर्धवट सोडली जात असल्याच्या तक्रारींवरही बैठकीत चर्चा झाली. अनेक विकासक अर्धवट काम करून निघून जात असल्याने रहिवाशांचे मोठे नुकसान होत आहे. ‘बिल्डरांच्या भांडणात लोकांचा बळी जात आहे,’ अशा शब्दांत सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली. प्रकल्प वेळेत पूर्ण करून रहिवाशांना घरे हस्तांतरित न करणाऱ्या विकासकांवर आता कडक कारवाई करावी लागेल, असे स्पष्ट निर्देश त्यांनी एस आर ए प्रशासनाला दिले.
ठाण्यात क्लस्टर पुनर्विकास योजनेत विविध पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची तरतूद आहे. त्यामुळे एस आर ए आणि क्लस्टर या दोन्ही योजनांमध्ये समन्वय साधून प्रकल्पांना गती देण्याची गरज असल्याचे सरनाईक यांनी नमूद केले. अंतर्गत वाद, विकासकांमधील संघर्ष आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे प्रकल्प रखडत असतील तर त्याचा फटका थेट सामान्य रहिवाशांना बसतो. त्यामुळे नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवून निर्णय घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
एस आर ए आणि क्लस्टरच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र वर्षानुवर्षे प्रकल्प रखडल्याने नागरिकांचा संयम सुटत आहे. त्यामुळे विकासक, प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी परस्परांचे वाद बाजूला ठेवून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ठोस कालबद्ध आराखडा तयार करावा, अशी अपेक्षा या बैठकीतून व्यक्त झाली. तर भूषण भानुशाली कटारिया, राजन बांदेलकर या विकासकांची कामे चांगली असून या विकसकांना संधी देण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.
विकासक संजय पांडे यांची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
सुभाषनगर, नळपाडा आणि इतर परिसरात माजी शिवसेना नगरसेवक आणि विकासक संजय पांडे यांच्याशी संबंधित प्रकल्पाबाबतही सरनाईक यांनी आक्षेप नोंदवला. ही कामे थांबविण्याबाबत आपण स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी बैठकीत स्पष्ट केले. विकासकामे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नव्हे, तर नागरिकांच्या हितासाठी झाली पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.‘संजय पांडे यांना विकासक म्हणून उभे करू नका,’ असे स्पष्ट मत व्यक्त करताना सरनाईक यांनी चांगले काम करणाऱ्या विकासकांना संधी देण्याची मागणी केली. यामुळे बैठकीतील हा मुद्दा विशेष चर्चेचा ठरला.
काही लोक फायद्यासाठी पक्षात आले
पक्षातील अंतर्गत राजकारणावरही सरनाईक यांनी नाव न घेता भाष्य केले. ‘काही लोक आमच्या पक्षात फायद्यासाठी आले,’ असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे सभागृहनेते तथा शिवसेना नगरसेवक हनुमंत जगदाळे यांना उद्देशून हा टोला असल्याची राजकीय चर्चा बैठकीनंतर रंगली.