

ठाणे : आशिया खंडातील सर्वात लांब पल्ल्याची म्हणून गौरवण्यात आलेली ठाणे जिल्ह्यातील श्रीमलंगगड फ्युनिक्युलर रेल्वे अधिकृत लोकार्पणापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. अद्याप शासकीय परवानग्या पूर्ण झाल्या नसताना फ्युनिक्युलरचे डबे हार-फुलांनी सजवून सुरु केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. शुक्रवारी (दि.5 डिसेंबर) श्री मलंगगड फ्युनिक्युलरचे डब्बे हार फुलांनी सजवले असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सदर फ्युनिक्युलरची सुरक्षा तपासणी, तांत्रिक मान्यता तसेच अंतिम ऑपरेशन परवानगी मिळालेली नसतानाही ती ‘विशेष व्यक्तींसाठी’ सुरु करण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये जोरात आहे. श्री मलंगगड परिसरातील एका राजकीय नेत्यांच्या गुरूंच्या घरी सुरू असलेल्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाड गडावर ये - जा करण्यासाठी फ्युनिक्युलरचा प्रत्यक्ष वापर करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
शासकीय प्रक्रिया पूर्ण न होता फ्युनिक्युलरचा वापर सुरू करणे हा थेट नियमबाह्य प्रकार असल्याने या कृतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या अशा सुविधांसाठी तांत्रिक तपासणी, सुरक्षा प्रमाणपत्र, आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा आणि संचालन परवानगी अनिवार्य असते. मात्र या सर्व प्रक्रियांना वळसा घालत फ्युनिक्युलर सुरू करण्यात आली, असा आरोप स्थानिक संघटनांनी केला आहे.
या सुविधेत एखादी तांत्रिक अडचण निर्माण झाली, एखादी दुर्घटना घडली तर जबाबदारी कोणाची? प्रशासनाने हा प्रकार कसा परवानगी शिवाय सुरू होऊ दिला? या सर्व प्रश्नांवरून आता श्रीमलंगगड परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप असा की, सामान्य जनतेसाठी नियम एक आणि मान्यवरांसाठी नियम दुसरे, अशी दुहेरी भूमिका उघड झाली आहे. आता या अनधिकृत फ्युनिक्युलर ऑपरेशनची चौकशी होणार काव? आणि अधिकृत लोकार्पणाविना सुरू केलेल्या या सेवेसंदर्भात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.