ठाणे : पुढारी वृत्तसेवा: मुंबई – नाशिक महामार्गावरील साकेत उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम रविवारी पूर्ण झाले. हा पूल आता अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली आहे. या उड्डाणपुलाची बेअरिंग निखळल्याने पूल हलू लागला होता. त्यामुळे हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. अभियंत्यांची टीम आणि अधिकच्या मनुष्यबळाचा वापर करून या पुलाच्या दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर अवघ्या चार दिवसांतच पूर्ण करण्यात आले.
साकेत उड्डाणपुलाच्या एक्स्पान्शनमधील बेरिंगचा पार्ट दि. 23 ऑगस्टरोजी निखळल्याने पूल अधिक हलू लागला होता. त्यामुळे या पुलावरील वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला होता. तर पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी ७ ते ८ दिवसांचा कालावधी लागणार होता. दुरूस्तीचे काम सुरू झाल्यानंतर या कालावधीत मात्र या मार्गावर नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. अखेर या पुलाच्या दुरुस्तीचे काम चार दिवसांतच पूर्ण करण्यात एमएसआरडीसीला यश आले.
दुरुस्तीच्या कालावधीत पुलावरील नाशिक दिशेची एक मार्गिका बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे त्याचा फटका वाहन चालकांना बसत होता. एकीकडे खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवास करणे जिकरीचे बनले होते. दुरुस्तीच्या कामामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुलाचे काम पूर्ण झाले असून पूल वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीपासून पुलावरील अवजड वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
– डॉ. विनय कुमार राठोड, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा
हेही वाचा