

ठाणे : उच्च न्यायालयाचे निर्देश डावलून कोपरीमध्ये रहिवासी भागात फटाक्यांची विक्री करणार्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात करण्यात आली आहे.
कोपरी बचाव समितीच्या वतीने ही याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून यामध्ये ठाणे महापालिकेला प्रतिवादी करण्यात आले आहे. ज्याप्रमाणे तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्रेत्यांना खुल्या मैदानात फटाके विक्रीची परवानगी दिली जाते. त्याच धर्तीवर रहिवासी भागात फटाक्यांची मोठमोठी दुकाने थाटून फटाक्यांची विक्री करणार्या दुकानदारांनाही खुल्या मैदानात स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
फटाक्यांची विक्री रहिवासी भागात न ठेवता खुल्या मैदानात विक्री करावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देश असताना कोपरी परिसरात आजही न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करत फटाक्यांची विक्री रहिवासी भागात सुरू आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षात या ठिकाणी अनधिकृत फटका विक्रेत्यांची दुकानेही वाढली असून रहिवाशांच्या जीवाशी खेळणार्या या फटाके विक्रेत्यांवर अंकुश ठेवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात कोपरी बचाव समितीने उच्च न्यायालयाच्या निर्देशाचा दाखल देत ठाणे महापालिकेला यापूर्वीच निवेदन दिले होते. या ठिकाणी रहिवासी भागात सुरू असलेल्या फटाके विक्रीवर कारवाई करण्याची मागणी समितीने ठाणे महापालिकेकडे निवेदनाच्या माध्यमातून केली होती.
काही फटाके विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, आमचा परवाना 1974 सालातील आहे. ठाणे महापालिकेची स्थापना 1984 साली झाली. त्यानंतर 1986 साली केंद्र शासनाचा परवाना घेण्यात आला. याचे प्रत्येक वर्षी तपासणी होते. प्रत्येक पाच वर्षात नूतनीकरण होते. ही कायदेशीर प्रक्रिया असून संपूर्ण देशात हा नियम आहे. ज्यांचा कायमस्वरूपी परवाना आहे ते जागेवर व्यवसाय करू शकतात. नवीन लोकांना तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय करण्यासाठी महापालिकाच खुले मैदान उपलब्ध करून देत असते. हाच नियम फटाके विक्रीच्या संदर्भात असल्याचे फटाके विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
दिवाळीचा सण तोंडावर आला असून यानिमित्ताने फटाक्यांची खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. ठाण्यात फटाके खरेदीसाठी कोपरी परिसर प्रसिद्ध असून येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची दुकाने आहेत. यामध्ये काही जुनी तर काही नव्याने अनधिकृत फटाके विक्री करणार्या दुकानांचीही भर पडली आहे. विस्फोटात्मक साठा रहिवासी भागात न ठेवता खुल्या मैदानात ठेवण्यात यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाचे आहेत. याच याचिकेचा दाखला देत याचिकाकर्ते हरेश सारवान यांनी ठाणे महापालिकेला पत्र दिले होते. यामध्ये अनेक दुकाने रहिवासी भागात असून फटाक्यांचा मोठ्या प्रमाणात साठा करणारे गोडावूनही याच रहिवासी भागात असल्याचे सारवान यांचे म्हणणे आहे. मात्र ठाणे महापालिकेच्यावतीने यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने अखेर रहिवासी भागात फटाके विक्रीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून तात्पुरत्या स्वरूपात फटाके विक्री करणार्यांची व्यवस्था मैदानात करण्यात येते. त्याप्रमाणे कोपरीतील दुकानांचेही खुल्या मैदानात स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.