

सापाड (ठाणे) : कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरातील पंचमुखी कॉलनीतील नाल्याच्या कामासाठी रस्ता खोदण्यात आला असून तब्बल पंधरा दिवसांपासून हे काम खोदाई करून ठप्प पडले आहे. परिणामी, शेकडो रहिवाशांचा मुख्य मार्ग बंद झाला असून शाळकरी मुले, कामावर जाणारे चाकरमानी आणि स्थानिक नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
कल्याणातील पंचमुखी मारुती कॉलनीत नाल्याचे काम ऐन पावसाळ्यात सुरू करण्यात आले आहे. नागरिकांनी आधीच प्रशासनाला विनंती केली होती की, पावसाळ्यात खोदकाम करू नये. मात्र या विनंतीचा महापालिका प्रशासनाने कोणताही विचार केला नाही. या भागातील सुमारे दहा सोसायट्यांमधील हजारों मुख्य रस्त्यावरून संपर्क पूर्णतः तुटलेला आहे. खोदलेला रस्ता चिखलमय, घसरडा व अतिशय अपायकारक आहे.
नागरिकांना रोजच्या जगण्यासाठी, कामावर जाण्यासाठी, शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवणीसाठी जाताना जोखमीने भरलेला मार्ग पार करावा लागत आहे. या खोदलेल्या रस्त्यावर अपघाताचा धोका प्रचंड वाढला आहे. मोटारसायकली घसरत आहेत, वृद्ध आणि महिला चालताना त्रास होत आहे. अशा वेळी कुणाचा जीव गेला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा सवाल नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. विशेष म्हणजे या खोदलेल्या रस्त्याचे काम अतिशय धीम्या गतीने होत असल्यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.
संबंधित अधिकार्यांकडे वारंवार तक्रार करूनही कोणतीही कृती झालेली नाही. काही ठिकाणी खोदकामानंतर यंत्रणाही दिसून येत नाही. त्यामुळे अपूर्ण कामावर तात्पुरती व्यवस्था करावी. नागरिक, विद्यार्थी, चाकरमान्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अन्यथा दोषींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आम्ही पंचमुखी मारुती कॉलनीमधील रहिवाशी आहोत. ड्रेनेज लाईनच्या कामासाठी कॉलनीत जाणारा रस्ता खोदण्यात आला. महापालिकेला पत्रव्यवहार करून सांगण्यात आले होते की, या दहा सोसायटींसाठी एकमेव रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता खोदण्यासाठी नागरिकांचा विरोध होता. मात्र महापालिकेने या पत्रांकडे दुर्लक्ष करत रस्ता खोदला गेला. मात्र, रस्त्याचे गेल्या पंधरा दिवसापासून काम अर्धवट ठेवून कामगार देखील काम करताना दिसत नाहीत. त्यामुळे आम्हा नागरिक, शाळकरी मुले आणि चाकरमान्यांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. - श्री प्रसाद, स्थानिक नागरिक