भिवंडी : भिवंडी शहरात पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांची दहशत पाहवयास मिळाली आहे. खळबळजनक बाब म्हणजे दोन दिवसात 135 नागरिकांना त्या भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला असून यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक होती. यापैकी एका चार वर्षाच्या चिमुरडीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने भिवंडी शहरात पालिका प्रशासनाविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी नागरिकांना दुचाकी चालकांना होत असताना या भटक्या कुत्र्यांपैकी काही पिसाळल्याने अनेकांना दंश करण्याच्या घटना भिवंडी शहरात वाढीस लागलेल्या आहेत. 7 आणि 8 जुलै या दोन दिवसात तब्बल 135 जणांना श्वान दंश झाल्याची घटना घडली होती. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मध्ये सर्वाधिक लहान मुलामुलींचा समावेश असून त्यामधील दोघांची प्रकृती गंभीर होती. खळबळजनक बाब म्हणजे गेल्या जून महिन्यामधील तीस दिवसात 886 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याची माहिती स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिक्षका डॉ. माधवी पंधारे यांनी दिली आहे. 7 जुलै रोजी भिवंडी शहरातल्या कामतघर परिसरात 60 नागरिकांना भटक्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले. तर शांतीनगर भागात आठ जुलै रोजी 45 जणांना एकाच भटक्या कुत्र्याने चावा घेऊन जखमी केले.
या गंभीर जखमीमध्ये शांतीनगर भागात राहणार्या लायबा शेख या चार वर्षीय मुलीचा समावेश होता. सुरुवातीला तिला भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याने दुसर्या दिवशी ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिच्यावर जखमांच्या ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात येऊन तिला तीन दिवसात घरी सोडण्यात आले. मात्र तीन दिवसापूर्वीच तिची पुन्हा प्रकृती गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल केलं. मात्र 25 ऑगस्ट रोजी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
यासंदर्भात समाजवादी पक्षाचे भिवंडीतील आमदार रईस शेख यांनी 8 जुलै म्हणजे घटनेच्या दिवशी पावसाळी अधिवेशनात भटक्या कुत्र्यावरील पालिका काहीच उपाययोजना करीत नसल्याने प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभागृहात चर्चा होऊन पालिकेला उपाययोजनेसाठी निर्देशही दिल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे. मात्र त्यावर काहीच उपाययोजना पालिका अधिकार्यांनी केलं नसल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली असून त्यासाठी 27 ऑगस्ट रोजी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचेही सांगितले.