

ठाणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांना प्रदेश सरचिटणीसपदी बढती करून प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला यांची ठाणे अध्यक्षपदी नियुक्ती करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यापुढे नवे आव्हान उभे करण्याची रणनीती आखली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश मुख्य प्रवक्ते माजी खासदार आनंद परांजपे यांच्याकडून अचानक अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. त्यांच्याजागी माजी नगरसेवक , सरचिटणीस नजीब मुल्ला यांची नियुक्ती करून नव्या राजकीय समीकरणे जुळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सात माजी नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवून शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सरकार मध्ये सामील असतानाही त्या सात माजी नगरसेवकांनी पवारांना नाकारून उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास दाखवला. यावरून अजित पवार गटात नाराजीचे सूर उमटू लागले आहे. कळवा आणि मुंब्रा विधानसभा मतदार संघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी.विक्रमी मतांनी विजय मिळवून महायुतीला चांगलीच चपराक दिली आहे. त्यामुळे त्याचे १४ माजी नगरसेवकांना शिवसेनेने आपल्या सोबत घेतले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेतृत्वाला त्यांना विश्वास देण्यास यश येऊ शकले नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत सर्वार्थानी सक्षम असलेले नजीब मुल्ला यांच्यावर ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांना अधिक बळ देताना प्रदेश सरचिटणीसपदी ही कायम ठेवले आहे.
तसेच निरीक्षक अल्पसंख्यांक विभाग, महाराष्ट्र प्रदेश, समन्वयक कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, भिवंडी महानगरपालिका या पदांची देखिल जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या खांदेपालट झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादीला कशी ताकद मिळते आणि त्यासाठी नजीब मुल्ला हे आमदार जितेंद्र आव्हाड यांना कसे नामोहरम करता, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.