

hiv Sena leader Ravindra Phatak wins Thane Vidhan Parishad seat unopposed
ठाणे : स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघामध्ये शिवसेना-महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अभिजीत पवार यांनी शिवसेना नेत्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपली माघार घेतली आहे. यामुळे बिनविरोध निवडून देण्याची ठाण्याची ऐतिहासिक परंपरा या निवडणुकीतही कायम राहिली आहे.
ठाणे विधान परिषदेच्या या निवडणुकीत थेट लढत पाहायला मिळत होती. महायुतीतर्फे शिवसेनेचे रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिजित पवार हे आमनेसामने उभे ठाकले होते. महायुतीच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय निश्चित मानला जात होता, तरीदेखील महाविकास आघाडीने आपला उमेदवार रिंगणात उतरवून महायुतीमधील अंतर्गत नाराजीचा फायदा उठविण्याची रणनीती आखली होती.
निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर, शिवसेना नेते तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक ट्विट करून मोठे आवाहन केले. "ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, ही लोकशाही आणि राजकीय सुसंस्कृततेची अपेक्षा आहे," असे त्यांनी म्हटले. आपल्या आवाहनात जुन्या आठवणींना उजाळा देत सरनाईक म्हणाले की, तत्कालीन काळात पुरेसे संख्याबळ नसतानाही वसंत डावखरे यांना बिनविरोध निवडून येण्याची संधी मिळावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उमेदवार दिला नव्हता आणि संभाव्य घोडेबाजार टाळला होता. आता त्या सद्भावनेची परतफेड करण्याची संधी राष्ट्रवादीच्या नेतृत्वासमोर आहे आणि त्यांनी ही संधी गमावू नये, असे नम्र आवाहन सरनाईक यांनी केले होते.
मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या या राजकीय सुसंस्कृततेच्या निर्णयाचे मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर स्वागत केले आहे.