

Kalyan Stabbing Incident
डोंबिवली : मित्राशी झालेल्या वादाचा राग मनात ठेवून तिघांनी मिळून एका तरूणावर चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास कल्याणच्या पत्रीपूलाजवळ घडली. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तिघा हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जखमी अरमान शेख याने दिलेल्या फिर्यादीवरून रेयान कुरेशी, नबील कुरेशी आणि अक्रम या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी अरमान याचे यातील आरोपींच्या एका मित्राशी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून तिघेजण संधीची वाट पाहत होते.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पत्रीपूलाजवळ अरमान आणि हे तिघे आमनेसामने आले. त्यांनी अरमानला जुन्या भांडणावरून जाब विचारला. त्यातून वाद सुरू झाला आणि वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपींनी अरमानच्या पाठीवर चाकूने वार केले. अरमान खाली कोसळताच तिघांनी तेथून पळ काढला. रक्तबंबाळ अवस्थेत अरमानला स्थानिकांसह मित्रांनी तातडीने रूग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अरमान यांच्या जबाबावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक घाडगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. अद्याप तिन्ही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मित्राच्या वादातून झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रात्रीच्या वेळी पत्रीपूल परिसरात अशा घटना वाढत असल्याने पोलिसी गस्त वाढविण्याची स्थानिक रहिवाशांनी मागणी केली आहे.