डोंबिवली: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून कल्याण पश्चिमेत बिर्ला कॉलेजच्या विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याला बंद गोदामात डांबून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणात भाजपाचे माजी नगरसेवक अर्जुन भोईर यांचा मुलगा मयूर भोईर आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांवर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
ही घटना गुरूवारी १३ ऑगस्ट रोजी घडली होती. बिर्ला कॉलेजचा विद्यार्थी अथर्व देशमुख आणि त्याचे मित्र एका ठिकाणी गेले असता गाडी बाजूला घेण्यावरून काही तरूणांशी त्यांचा वाद झाला. त्यानंतर हरवलेले पाकीट शोधण्यासाठी विद्यार्थी पुन्हा त्या परिसरात गेले असता टोळक्याने त्यांना घेरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या हल्ल्यात लाठी, बांबू आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला आहे. अथर्व देशमुख याला रस्त्यावरून उचलून नेत एका गोदामात डांबण्यात आले. तेथे शर्ट फाटेपर्यंत त्याला मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या मारहाणीत अथर्वच्या डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्याच्यावर सध्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या मारहाणीत दानिश शेख हा विद्यार्थी देखील जखमी झाला आहे.
आपल्या मुलाला मारहाण होत असल्याची माहिती मिळताच अथर्वचे वडील सागर देशमुख यांनी थेट गोदामात धाव घेत मुलाची सुटका केली.
आणखी पाच मिनिटे उशीर झाला असता, तर माझा मुलगा जिवंत राहिला नसता, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. एकीकडे या घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांनी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले.
अधिक तपास सुरू आहे. तर दुसरीकडे भाजपा नेत्याच्या मुलाच्या या दादागिरीमुळे कल्याण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे.