

डोंबिवली : कल्याण-पडघा मार्गावरील वर्दळीच्या गांधारी उड्डाणपुलावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या गर्डरवरील लोखंडी संरक्षक पट्टी गायब झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या ठिकाणी निर्माण झालेल्या फटीतून थेट खाली गांधारी नदीचे पात्रही दिसत आहे.
यापूर्वीच पुलावर मोठे खड्डे असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. त्यातच आता संरक्षक पट्टी निखळल्याने रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. अवजड वाहने, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावरील लोखंडी संरक्षक पट्टी त्वरित बसवावी. तसेच पुलावरील खड्ड्यांची युद्धपातळीवर दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
गांधारी पुलावरील धोके
कल्याण-पडघा मार्गावरी गांधारी उड्डाणपूल वाहनांसाठी धोकादायक बनला आहे. संरक्षक लोखंडी पट्टी गायब झाल्या असून मोठे खड्डेही पडले आहेत. फटीतून चक्क नदी दिसत आहे. रात्री व पावसाळ्यात अपघाताची शक्यता वाढली आहे. तातडीने बॅरिअर बसवणे व खड्डे बुजवणे, अशा सूचना स्थानिक रहिवाशांनी केल्या आहेत.