

ठाणे: गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीला लागलेल्या आगीनंतर ठाणे महापालिका प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला असून प्रशासनाच्या या बेजबाबदार कारभारावर चौफेर टीका होत आहे.
तर दुसरीकडे केवळ भाजी मंडईची परवानगी असताना या ठिकाणी कपड्याची दुकाने कशी थाटली गेली? प्रभाग समितीमध्ये येणाऱ्या सहाय्यक आयुक्तांना ही कपड्याची दुकाने दिसली नाहीत का? असा प्रश्न उपस्थिती करत नौपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना निलंबित करण्याची मागणी भाजपच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
ठाण्यातील अतिशय गजबजलेल्या गावदेवी भाजी मंडईला लागलेल्या भीषण आगीमध्ये महापालिकेचे सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन विभागाचा अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाचा बेजबाबदारपणा समोर आला असून ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता पालिका प्रशासनाच्या वतीने सुरक्षेच्या उपाय योजना करण्यात येत आहेत.
या घटनेनंतर तातडीची एक बैठक पालिका आयुक्तांनी घेतल्यानंतर या बैठकीमध्ये गावंदेवी भाजी मार्केट मध्ये केवळ भाजी मंडईला परवानगी असताना या ठिकाणी चपला आणि कपड्यांची दुकाने देखील थाटण्यात आली होती अशी कबुली स्वतःच पालिका प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर उभा सर्व प्रकारची चौकशी देखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे याच भाजी मंडईच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय असून इजा इमारतीमध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्तांची रोज ये जा असताना त्यांना ही कपड्याची आणि चपलांची दुकाने दिसली नाहीत का ? ही दुकाने नक्की कोणाच्या आशीर्वादाने सुरु होती असे प्रश्न भाजपचे नगरसेवक सीताराम राणे यांनी उपस्थित केले आहेत.
यासंदर्भात राणे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र दिले असून नौपाडा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेशकुमार जामनेर यांना निलंबित करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.