ठाणे: शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आधार ठरत आहे. ठाणे जिल्ह्यात आर्थिक वर्षात 2 हजार 514 रुग्णांना सुमारे 21 कोटी 74 लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, तातडीने अर्जाचा निपटारा करणे आदी सकारात्मक बदल करण्यात आले. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राऊ ड फंडिंग आदींच्या माध्यमातून समाजातील मदत करणारे रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय, संस्था, दाते आदींचे सहकार्य लाभत आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीतील सुधारणा व मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्याने पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग वाढला आहे. परिणामी, अधिकाधिक पात्र गरजू रुग्णांना वेळेत आर्थिक सहाय्य उपलब्ध होत आहे. 20 गंभीर आजारासाठी मदत कॉक्लियर इम्प्लांट (वय 2 ते 6), हृदय, यकृत, किडनी, फुफ्फुस, बोन मॅरो, हाताचे, गुडघ्याचे प्रत्यारोपण, हिप रिप्लेसमेंट, कर्करोग शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, लहान बालकांची शस्रक्रिया, मेंदूचे आजार, हृदयरोग, डायालिसिस, कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन), अस्थिबंधन, नवजात शिशुंचे आजार, बर्न (भाजलेले) रुग्ण, विद्युत अपघात रुग्ण या अशा एकूण 20 गंभीर आजारांसाठी आर्थसहाय्य दिले जाते.
सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन व टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोग उपचारासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारामुळे सामाजिक दायित्व (सीएसआर) अंतर्गत उपचारांसाठी विशेष निधी उपलब्ध होणार आहे. आर्थिक अडचणी कमी होऊन गरजू बालकांना गुणवत्तापूर्ण कर्करोग उपचार सुलभ होणार आहेत.
आर्थिक वर्षातील मदत
1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी 6 लाख 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. तर, याच कालावधीत ठाणे जिल्ह्यातील 2514 रुग्णांना सुमारे 21 कोटी 74 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. गरजू रुग्णांनी योजनेचा लाभ घेण्याकरिता आणि अधिक माहितीकरिता 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.