

Mahad Water Supply Cut News
महाड: महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील जिवंत पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील मृतसाठा पंपाद्वारे उचलून सद्यस्थितीमध्ये पाणीपुरवठा करावा लागत असल्याने या धरणातून महाड शहराच्या जवाहर नगर, रोहिदास नगर ते भीम नगर सुलतान गल्ली पर्यंतच्या दक्षिण दिशेकडील भागाला बुधवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे.
दवंडीद्वारे संबंधित नागरिकांना याची माहिती देण्यात आली. कोथुर्डे धरणातील पाणीपुरवठा आजच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेपाच पासून सुलतान गल्ली सरेकर आळी काजळपुरात दस्तुरी नाका ,सहा वाजता भीम नगर, दुपारी साडेबारा वाजता देशमुख मोहल्ला, सायंकाळी पाच वाजता चवदार तळे गोमूखे आळी डोंगरे गल्ली तर उद्या 16 एप्रिल रोजी सकाळी साडेपाच पासून प्रभात कॉलनी, जवाहर कॉलनी, तांबड भुवन ,इत्यादी परिसर, सकाळी 11 वाजता काकरतळे, सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सायंकाळी साडेसहा वाजता रोहिदास नगर विरेश्वर आव्हाड या परिसरात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
चालू वर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होऊन देखील महाड शहरातील नागरिकांना या भीषण पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी आलेली ही वेळ प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यानेच झाल्याचा आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
धरणांमधून महाड शहराला होणारा पाणीपुरवठा रायगड मार्गावर अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याने पाणी वाया गेले होते. या संदर्भात संबंधित ठेकेदारा विरोधात नगरपालिकेने काय कारवाई केली अशी विचारणा आता महाडकर नागरिकांकडून केली जात आहे. चालू वर्षी 15 एप्रिल पासूनच एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने पुढील 31 मे पर्यंत साठा योग्य पद्धतीने नियोजन करावे लागणार आहे.