

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील लागवडीखालील शेती क्षेत्रात वर्षभरात तब्बल ७ हजार ३८५ हेक्टरची घट झाली आहे. २०२५-२६ मध्ये ६० हजार ७१९.०९ हेक्टर असलेले लागवडीखालील क्षेत्र २०२६-२७ मध्ये ५३ हजार ३३३.६१ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे एकूण शेती क्षेत्रात सुमारे १२.१६ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्याचे प्रमुख खरीप पीक असलेल्या भाताच्या क्षेत्रात सर्वाधिक घट झाली असून, ५५ हजार २४३ हेक्टरवरून ते ४९ हजार ८५५ हेक्टरवर आले आहे.
ठाणे जिल्ह्याची ओळख वेगाने नागरीकरण आणि औद्योगिकीकरण होणारा जिल्हा अशी असली तरी शहापूर, मुरबाड, भिवंडी परिसरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. मात्र वाढते नागरीकरण, औद्योगिक वसाहती, रस्ते आणि विविध पायाभूत सुविधांसाठी होणारा जमिनीचा वापर यामुळे शेतीच्या जमिनीवरही दबाव वाढत आहे.
त्याचबरोबर शेतीतील वाढता उत्पादन खर्च, मजुरांची उपलब्धता, शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि तरुण पिढीचा शेतीकडे कमी होत असलेला कल हीदेखील लागवडीखालील क्षेत्र घटण्यामागील महत्त्वाची कारणे मानली जातात. जिल्ह्याच्या अधिकृत माहितीनुसार ठाणे व उल्हासनगर हे पूर्णपणे शहरी तालुके असून कल्याण, भिवंडी व अंबरनाथ हेही तुलनेने अधिक विकसित भाग आहेत.
भौगोलिक परिस्थितीचाही ठाण्याच्या शेतीवर मोठा प्रभाव आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात सह्याद्रीच्या रांगा व डोंगराळ भूभाग, मध्य भागात भातशेती आणि पश्चिम भागात फलोत्पादन, भाजीपाला व इतर पिकांची लागवड अशी शेतीची रचना आहे. जिल्ह्यातील सुमारे ३५.८३ टक्के भूभाग वनक्षेत्राखाली असून लागवडीस उपलब्ध जमीन मर्यादित आहे.
जिल्हा अतिपर्जन्य कोकण पट्ट्यामध्ये येत असला तरी शेती मोठ्या प्रमाणावर पावसावर अवलंबून आहे; दरम्यान उपलब्ध असलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार निव्वळ ओलित क्षेत्रही तुलनेने अत्यल्प आहे. त्यामुळे पावसाच्या लहरीपणाचा आणि हवामानातील बदलांचा खरीप पिकांवर थेट परिणाम होतो. यंदाच्या खरीप हंगामातही मान्सूनच्या विलंबामुळे भात लागवडीचा वेग मंदावल्याचे चित्र आहे.
ठाण्याच्या शेतीची बदलती दिशा
ठाणे जिल्ह्यात भात, वरी आणि नाचणी ही पारंपरिक महत्त्वाची पिके आहेत. मात्र उपलब्ध आकडेवारीत भाताबरोबरच वरी, मूग, उडीद आणि कारळ या पिकांच्या क्षेत्रातही घट झाली आहे. दुसरीकडे तुरीचे क्षेत्र १,१७९ वरून १,५२० हेक्टरवर वाढले असून मक्याच्या क्षेत्रातही किंचित वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतीचे एकूण क्षेत्र कमी होत असताना पिकांच्या निवडीमध्येही बदल होत असल्याचे दिसून येते. बाजारपेठेची मागणी, उत्पादन खर्च, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक हवामान यानुसार शेतकरी पीक पद्धतीत बदल करत असल्याचे चित्र आहे.