

टिटवाळा : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले असून महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. भटक्या कुत्र्यांच्या झुंडीमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत. रस्त्यावर फिरणार्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडींनी नागरिकांसाठी मोठा धोका निर्माण केला आहे. मांडा टिटवाळा येथे मागील महिन्यात एका महिलेवर कुत्र्यांनी केलेला जीवघेणा हल्ला तसेच कल्याण येथील एका लहान मुलावर केलेला हल्ला अश्या गंभीर घटना घडुनही अद्यापही महापालिका प्रशासनाकडुन ठोस उपाययोजना न केल्याने नागरिकांचा महापालिकेच्या कार्यक्षमतेवरचा विश्वास उडाला आहे.
अनेक भागांमध्ये रस्त्यावर उघडव्यावर टाकण्यात येणारा कचरा आणि शिळे अन्न हे भटक्या कुत्र्यांच मुख्य अड्डा बनले आहेत. ओला-सुका कचरा व्यवस्थापनाचा अभाव आणि अनधिकृत खाद्यपदार्थाच्या हातगड्या आणि कचर्याची योग्य विल्हेवाट न लावणारे चिकन सेंटर, कचरा यामुळे कुत्र्यांची झुंडी अधिकच बळकट होत आहेत. काही नागरिक भटक्या कुत्र्यांना अन्न देऊन त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष वापर दुकानांच्या आणि घरांच्या सुरक्षेसाठी करत आहेत. यामुळे कुत्रे आक्रमक होण्याचा धोका वाढला आहे. बिल्डिंग परिसरातील नागरिकांनी कुत्र्यांच्या झुंडीमुळे होणार्या त्रासाबाबत तक्रारी केल्या आहेत, मात्र महापालिकेने अद्याप योग्य ती कारवाई केली नाही.
कल्याण, डोंबिवली, आंबिवली परिसर, टिटवाळा अशा महापालिका क्षेत्रातील सर्वच भागात कुत्र्यांची दहशत वाढली आहे. रात्रीच्या वेळेस उशिरा घरी परतणार्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. मांडा येथे रात्रीच्या वेळेस महिलेवर कुत्र्यांनी केलेला जीवघेणा हल्ला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मात्र त्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिकेने ओला-सुका कचरा संकलनाची यंत्रणा उभारली असली, तरी अनेक भागात नागरिक रस्त्यांच्या बाजूला, चौकांमध्ये, इमारतींच्या लगत अद्यापही मोठ्या प्रमाणात कचरा, शिळे अन्न टाकत असल्याने ही ठिकाणेही भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचे अड्डे बनले आहेत. उघड्यावर कचरा फेकणार्यांवर जोपर्यंत सातत्याने कारवाई होत नाही तोपर्यंत हे प्रकार असेच सुरु राहतील, असे दिसते. त्यामुळे याबाबतही कठोर उपाययोजना करण्याची गरज दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मांडा पश्चिमेत श्रीराम प्लाझा समोर, डीएनएस बँक तसेच या बँकेजवळील बिल्डींग समोर, निमकरनाका चौक, आनंद दिघे मार्गावरील एकदन्ताय सोसायटी समोर रस्त्यावर, वाजपेयी चौक, नांदप रोडवरील जय मल्हार ढाबा परिसर, इंदिरानगर परिसर, सावरकरनगर मधील आतील भागातील साई गणेश कॉलनी 1 व 2 हा भटक्या कुत्र्यांच्या झुंडी असलेली काही ठिकाणे आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या समस्या असणारी ठिकाणे निश्चित करून व नागरिकांच्या तक्रारी मागवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची गरज दिसत आहे. रस्त्यावर फिरणार्या भटक्या कुत्र्यांच्या झुंडींनी आता उग्र रूप धारण केले आहे. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिकेने त्वरीत उपाययोजना करण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भटक्या कुत्र्यांच्या झुंडींचा बंदोबस्त करण्यासाठी कारवाई करावी तसेच कचरा व्यवस्थापनासाठी कठोर धोरणे लागू करावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.