

ठाणे : चुकांमधुनच माणुस शिकतो, पण आपल्याला वाटतं आपण फायर आहोत, परंतु हे आयुष्य एकच आहे. तेव्हा, फायर सारखं जाळु नका तर फ्लॉवर सारखं आयुष्य जगण्यासाठी नियम पाळा... सिग्नल दिसल्यावर रुकेगा साला ! असा “पुष्पा स्टाईल संदेश सिनेनाटय अभिनेते श्रेयस तळपदे यांनी दिला. रस्ता सुरक्षा अभियान - 2026 च्या अनुषंगाने ठाणे पोलीस वाहतूक विभागाने राबविलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी तळपदे यांनी हा मौलिक संदेश युवापिढीला दिला.
पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी या पिढीने वाहतुकीचे नियम पाळणे किती महत्वाचे आहे, हा संदेश या कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्तम प्रकारे जनमानसात पोहचल्याचे सांगितले. तर, ठामपा आयुक्त सौरभ राव यांनी, आयुष्यात मार्गक्रमण करताना सर्वाच्या सुरक्षिततेकरीता मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक... हे सुत्र जपल्यास निश्चितच अपघात टळु शकतील. असा विश्वास व्यक्त केला. दरम्यान, कार्यक्रमाच्या शेवटी अभिनेते श्रेयस तळपदे यांनी सर्व उपस्थितांना वाहतुक नियम पाळण्याची शपथ देण्यात आली.
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या निर्देशानुसार, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान 2026 च्या अनुषंगाने ठाणे पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागाने राबविलेल्या अभियानाचे दमदार उद्घाटन शनिवारी राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले. याप्रसंगी, अभिनेते श्रेयस तळपदे, उद्योजक रायडर अभिजीत गानु, वाहतुक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाठ, एनएसएसचे प्रा.विनय विचारे व वरिष्ठ तसेच कनिष्ठ पोलीस अधिकारी आणि रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी) संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्रेयस तळपदे यांनी, सुरक्षा अभियानाची स्तुती केली. तसेच रस्ता सुरक्षा म्हणजे काय? हे प्रथमच उमगल्याचा किस्सा सांगताना, आपल्या महाविद्यालयीन जीवनातील पहिल्या दुचाकी सवारीवेळी स्वतःच्या चुकीमुळे घडलेल्या अपघाताची आठवण जागवली. तसेच चुकांमधुनच माणुस शिकत असतो याचा प्रत्यय आल्याचे सांगून, पुष्पा चित्रपटातील डॉयलॉग उपस्थितांसमोर सादर केला. प्रत्येकाला वाटतं आपण फायर आहोत, पण हे आयुष्य एकच आहे. तेव्हा, त्याला फायर सारखं जाळु नका तर फ्लॉवर सारखं आयुष्य जपा. सिम्नल तोडावासा वाटला तर दोन मिनिटे थांबुन दीर्घ श्वास घेत कुटुंबियांची आठवण करा. तसेच, सिग्नल बघितल्यावर एकच वाक्य लक्षात ठेवायचं, ते म्हणजे, राव... रुकेगा साला ! असा मिश्किल संदेश तरुणाईला दिला.
पोलीस मित्र सुप्रिया कुलकर्णी यांनी वर्दीची कथा आणि व्यथा मांडुन पोलीस दादांच्या कर्तव्याची गाथा उलगडली. तर वाहतुक जनजागृती विषयी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या उल्हासनगरच्या एसएसटी महाविद्यालयाचे पथनाटय यावेळी सादर करण्यात आले. दरम्यान, वाहतुक शाखेच्यावतीने सर्व गृहनिर्माण सोसायट्या, शासकिय व खाजगी कार्यालयांमध्ये ये-जा करताना वाहतुक नियमांची जाणीव जागृती व्हावी याकरिता ‘कॅम्पस विथ सीट बेल्ट ॲण्ड हेल्मेट’ हा उपक्रम राबविण्याचा श्रीगणेशा करण्यात आला. तसेच वाहतुक विभागाची कवायत आणि वाहतुक पोलिसांचे हात वारे हे इशारे कशाप्रकारे समजावेत याचेही मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 1998 पासुन आजपावेतो शिस्तबद्ध रिक्षा चालविल्याने एकही दंडाचे चलान न लागल्याबद्दल डोंबिवलीतील रिक्षाचालक विकास देसाई यांचाही सन्मान करण्यात आला.