

कल्याण: कल्याण ग्रामीण मतदार संघातील तब्बल दोन लाख ५५ हजार मतदाराची नावे कमी केल्याचा मनसे नेते राजू पाटील यांचा दावा करीत एसआयआर, ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर टीका करीत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
डोंबिवलीतील मनसे कार्यालयात भाजपमधून पुन्हा मनसेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मनसे नेते राजू पाटील यांनी आगामी राजकारणाबाबत मोठे विधान केले आहे. पुढच्या अडीच वर्षांत १०० टक्के मी आमदार होणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
कल्याण ग्रामीण मतदारसंघातील एसआयआर प्रक्रियेवर भाष्य करताना नेते पाटील यांनी मतदार यादीतून तब्बल दोन लाख ५५ हजार मतदारांची नावे कमी झाल्याचा दावा केला. यामध्ये मृत, स्थलांतरित तसेच ठावठिकाणा नसलेल्या मतदारांचा समावेश असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.
यावेळी नेते पाटील यांनी ईव्हीएम, निवडणूक आयोग आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजपकडून हिंदुत्व आणि परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना कोणत्याही वादात किंवा भांडणात न पडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याचे नेते पाटील यांनी सांगितले. विरोधकांकडून मनसेला जाणीवपूर्वक वादात ओढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान २०२९ साली मनसेकडून राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघातून निवडणूक लढविली. त्यांनी शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांना पराभूत केले.
२०२४ साली राजू पाटील हे पुन्हा निवडणूक रिंगणात होते. शिंदे सेनेचे राजेश मोरे यांनी त्याचा पराभव केला. कारण पाटील हे शिंदे सेनेच्या विरोधात होते. मात्र महापालिका निवडणुकीनंतर मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे शिंदे सेनेची साथ त्यांना लाभली आहे. त्यामुळे त्यांनी येत्या अडीच वर्षात १०० टक्के आमदार होण्याचा दावा केला आहे. आता वगळलेल्या मतदारांवरून सर्वत्र रान उठणार आहे.