ठाणे, पुढारी वृत्तसेवा : ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी (दि.9) हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जाहीर आहे. त्यामुळे जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य़ परिस्थिती असणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
या धरतीवर ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व माध्यमातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आणि ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने असे परिपत्रक काढले आहेत. जिल्ह्यात कोसळत असलेल्या अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यास त्रास होऊ शकतो. हे लक्षात घेऊन ही दक्षता घेण्यासाठी निवासी जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी म्हटले आहे.